सत्तारूढ गटाच्या २० एप्रिललाच पॅनेलची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:22 AM2021-04-14T04:22:57+5:302021-04-14T04:22:57+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी सत्तारूढ गट इच्छुकांच्या मुलाखती घेणार नाही. थेट २० एप्रिलला अंतिम क्षणी पॅनेलची घोषणा केली जाणार ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी सत्तारूढ गट इच्छुकांच्या मुलाखती घेणार नाही. थेट २० एप्रिलला अंतिम क्षणी पॅनेलची घोषणा केली जाणार आहे. मागील निवडणुकीतही सत्तारूढ गटाने शेवटच्या दिवशी पॅनेलची घोषणा करून विरोधकांची गोची केली होती.
‘गोकुळ’साठी विरोधी शाहू आघाडीने मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पॅनेल बांधणीची चाचपणी केली. त्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ गटात मात्र इच्छुक प्रचाराला लागले आहेत. ठरावधारकांच्या गाठीभेटी सुरू आहेत. येथे मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. थेट माघारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २० एप्रिल रोजी अंतिम क्षणी पॅनेलची घोषणा केली जाणार आहे.
शिवसेनाही घेणार आढावा
शिवसेनेला विरोधी पॅनेलमध्ये चार-पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांबाबत खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, आदी नेते आढावा घेणार आहेत.
निवडणुकीचा गुरुवारी होणार फैसला
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात कोणत्याही क्षणी राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते. अशा पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’च्या निवडणुका घेऊ नयेत, यासाठी सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार असून या दिवशीच निवडणुकीचा फैसला होण्याची शक्यता आहे.