लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चोवीस तास अलर्ट, कोणत्याही आपत्तीशी लढण्याची तयारी, अत्यंत जोखमीचे काम, पण लईच कमी दाम. सांगायलाही कमीपणा वाटावं इतकं ! कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील फायरमन्सची ही अवस्था आहे. सहा-सात वर्षे काम करुनही त्यांना सेवेत कायम करुन घेण्यास तसेच मानधनाची रक्कम वाढवून देण्यास प्रशासनाकडून उदासिनता दाखवली जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल चोवीस तास कोणत्याही प्रकारच्या आपत्तीशी लढण्यास तयार असते. आगीसारख्या घटना असोत की महापुरातील अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम असो, आपत्तीवेळी अग्निशमनचे जवान तत्काळ घटनास्थळी जाऊन संपत्तीचे, जीवांचे रक्षण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. त्यांच्या कार्याला तोड नाही. महानगरपालिकेतील हा एकमेव विभाग आहे जो प्रामाणिक, तत्परतेने काम करत आहेे. परंतु, ठोक मानधनावरील फायरमन, चालकांना मिळणारे मानधन त्यांच्यात एकप्रकारचे नैराश्य आणणारे आहे.
अग्निशमन दलाकडे अधिकारी, फायरमन, चालक तसेच अन्य कर्मचारी मिळून १८५ पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांत नियमित सेवेतील जवळपास १३५ अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले. पण त्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या झाल्या नाहीत. एकूण उत्पन्नाच्या पस्तीस टक्केच प्रशासकीय खर्च असला पाहिजे, या शासकीय अटीचा फटका या विभागाला बसला आहे. शासकीय अटीमुळे प्रशासनाचे हात बांधले आहेत.
रिक्त जागा नव्याने भरल्या नाहीत म्हणून ठोक मानधनावर कर्मचारी नेमण्याचा मध्यमार्ग प्रशासनाने स्वीकारला. त्यानुसार चालकांना बारा हजार तर फायरमनना दहा हजार रुपये मानधन देण्यात येते. गेल्या सहा-सात वर्षांपासून १३५ कर्मचारी ठोक मानधनावर काम करत आहेत. त्यांचे मानधन वाढत नाही आणि सेवेतही कायम करुन घेतले जात नाही. त्यामुळे हे कर्मचारी विचित्र कात्रीत सापडले आहेत.
उद्या पालकमंत्री घेणार आढावा -
उद्या, शुक्रवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील महानगरपालिकेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत रोजंदारीवरील कर्मचारी, अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करणार आहेत. थेट पाईपलाईन योजनेचाही आढावा घेणार आहेत.
- किमान मरण्यापूर्वी कायम करा -
महानगरपालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या ३४९ इतकी आहे. यातील बहुसंख्य कर्मचारी २५ ते ३० वर्षे रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांना अद्याप कायम केलेले नाही. किमान मरण्यापूर्वी तरी सेवेत काम करावे, अशी रोजंदारी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.