कोल्हापूर : वेळ दुपारी साडेचारची... रक्षाबंधन असल्याने नेहमीपेक्षा शनिवारी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. काही पोलीस अधिकारी सणानिमित्त घरी होते. तर पोलीस आॅनड्युटी बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेले होते. प्रत्येक पोलीस ठाण्यात आठ ते दहाच कर्मचारी बसून होते. अचानक उजळाईवाडी विमानतळावर अतिरेकी हल्ला झाल्याचा निनावी दूरध्वनी पोलीस कंट्रोल रूमला आला. कंट्रोलरने त्वरित ही माहिती बॉम्बशोध पथकासह शहरातील पोलीस ठाण्यांना दिली. या संदेशाने अधिकाऱ्यांसह पोलिसांची तारांबळ उडाली. अवघ्या पंधरा मिनिटांत सशस्त्र पोलिसांची फौज घटनास्थळी पोहोचली. पटापट चालत्या गाडीतून पोलिसांनी उड्या मारत विमानतळ परिसराला घेराव घातला. मुख्य इमारतीमध्ये अतिशय सावधपणे जवान व पोलिसांनी प्रवेश केला. पाहतात तर सगळं काही शांत..शांत..आपले पोलीस सक्षम असल्याचे पाहताच पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्मितहास्य करीत सर्वांना ही रंगीत तालीम असल्याचे सांगितले. विमानतळावर अतिरेकी हल्ला झाल्याचा निनावी दूरध्वनी कंट्रोल रूमला येताच ड्युटीवर असलेल्या पोलिसांची बोबडीच वळली. त्यांनी हा संदेश शहरातील व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिला. त्यानंतर तत्काळ पोलीस अधीक्षकांनाही संदेश दिला. पोलीस मुख्यालयातून पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक, क्राईम ब्रँच, बॉम्बशोध पथक, राज्य राखीव दल, स्पेशल कमांडर, जलद कृती दलाचे जवाण, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, बिट मार्शल, अग्निशामक दल, रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक असा लवाजमा विमानतळावर पोहोचला. विमानतळाला चारही बाजूंनी वेढा घालून मिलिटरी जवान व सशस्त्र पोलिसांचे पथक मुख्य इमारतीच्या दिशेने चाल करून गेले. समोरून गोळीबार होऊ शकतो, ही खबरदारी घेत जवान व पोलीस आतमध्ये घुसले. पाहतात तर सगळं काही शांत... बॉम्बशोध पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढत एक बॉम्ब निकामी केला. तर दोन नकली अतिरेक्यांना ताब्यात घेतले. आॅपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्यांनी अधीक्षक डॉ. शर्मा यांना कॉल दिला. त्यांनी घटनास्थळी येऊन स्मितहास्य देत, ये तो डेमो था भाई, असे म्हटल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)
अतिरेकी हल्ल्याच्या अफवेने तारांबळ
By admin | Updated: August 30, 2015 01:04 IST