कोल्हापूर : इनशर्ट का केला नाहीस, या कारणावरून रॅगिंंग करून कृषी महाविद्यालयातील इंदापूरच्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील पाच विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, इंदापूरचा हा विद्यार्थी कृषी महाविद्यालयातील बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला वसतिगृहासह त्याच्या वर्गातील काही विद्यार्थी वर्चस्ववादातून नेहमी ) त्रास देत होते. महाविद्यालयाच्या परिसरात या वर्चस्ववादातून त्याच्यावर सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रॅगिंग करत त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला ‘तू इनशर्ट का केला नाहीस’ तसेच ‘तू रेल्वेसारखे चालून दाखव’ असे करण्यास सांगितले. मात्र, त्याला संबंधित विद्यार्थ्याने नकार दिला. त्यावर त्याला रॅगिंग करणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनी मारहाण केली. त्यातून त्याने सुटका करून घेत वसतिगृहात धाव घेतली. त्यानंतर मोबाईलवरून हा प्रकार त्याने पालकांना सांगितला. काही तासांत या विद्यार्थ्यांचे पालक कोल्हापुरात आले. त्यांनी माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. तेथून रामुगडे, पालकांनी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जी. खोत यांची भेट घेतली. याठिकाणी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाईही दाखल झाले. यावेळी मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे पालक, रामुगडे व देसाई यांनी रॅगिंगच्या या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदविला तसेच संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी डॉ. खोत यांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बोलावले; परंतु, मारहाण करणारे विद्यार्थ्यांनी याला दाद दिली. त्यावर रामुगडे, देसाई आणि डॉ. खोत यांनी वसतिगृहाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. याठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना बोलावून घेतले. यावेळी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माफी मागितली. त्यावर रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आमची तक्रार नसल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणावर सायंकाळी पडदा पडला. दरम्यान, रॅगिंग झालेल्या संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्या मुलाने राजर्षी शाहू महाराजांच्या करवीरनगरीत शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती. त्यानुसार त्याला येथील कृषी महाविद्यालयात दाखल केले. मात्र, येथे माझ्या मुलाला झालेल्या मारहाणीचा प्रकार निंदनीय आहे. असे प्रकार घडू नये, याची खबरदारी महाविद्यालयाने घ्यावी.संबंधित विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे प्रकरण मला त्याच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर समजले. संबंधित विद्यार्थ्यांमध्ये इनशर्ट करण्याच्या कारणावरून मारहाणीचा हा प्रकार घडला आहे. त्यानुसार मी पुढील कारवाई म्हणून विद्यार्थ्यांना बोलाविले. त्यांनी मारहाण केलेल्या विद्यार्थ्याची माफी मागितली. या प्रकरणाची लेखी तक्रार माझ्याकडे आली नाही.- डॉ. जी. जी. खोत, सहाय्यक अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय,कोल्हापूर.वसतिगृहात तोडफोड...रॅगिंग करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांच्या या गटाने शनिवारी (दि. १२) वसतिगृहातील खिडक्यांच्या काचा तसेच विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षाच्या दुचाकीची तोडफोड केल्याचे यावेळी डॉ. खोत यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले.
कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यावर रॅगिंग
By admin | Updated: March 15, 2016 01:26 IST