राधानगरी : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागाची तहान भागविणारे राधानगरी धरण पूर्ण भरले आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूझाला. राधानगरी धरण ८.३६ टी.एम.सी क्षमतेचे आहे. गतवर्षी १ आॅगस्ट रोजी धरणाचे दरवाजे खुले झाले होते. मात्र, यावर्षी पावसाने ओढ दिल्यांने धरण भरण्यास आॅगस्ट अखेर उजाडला. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वीजनिर्मिती ठप्प आहे. परिणामी ३0 ते ४0 लाख युनिट विजेला मुुकावे लागले आहे. आजपर्यंत येथे २३७७ मि.मी. पाऊस झाला आहे. धरणाची पाणीपातळी ३४७.३0 फूट झाली आहे. पाणीसाठा ८.३00 टी.एम.सी. आहे. ३४७.५0 फुटांवर पाणीपातळी गेल्यावर दरवाजे उघडतात. सायंकाळी साडेसहा वाजता यातील सहा नंबरचा एक दरवाजा उघडला. या धरणाशेजारीलच २५.४0 टी.एम.सी. क्षमता असणाऱ्या काळम्मवाडी येथील शाहू सागर जलाशयात सध्या १८.६९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. येथे आतापर्यंत १५९९ मि. मी. पाऊस झाला आहे. जूनअखेर धरणात ७.३६ टी.एम.सी. पाणीसाठा होता. २१ आॅगस्टपासून काळम्मावाडीच्या लाभ क्षेत्रातील पाणीटंचाईमुळे ४०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला, तर वीजनिर्मितीसाठी दोन प्रकल्पांत १८०० क्युसेक विसर्ग सुरूआहे. तालुक्यातील तुळशी धरणात आज २.५७ टी.एम.सी. पाणी साठा आहे.
राधानगरी धरण ‘ओव्हर फ्लो’
By admin | Updated: August 25, 2015 00:06 IST