लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या दरात वाढ केली असून त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. यासाठी केंद्र सरकारने खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर व केंद्रीय खते, रसायने मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली.
गेले वर्षभर कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्याने शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरत आहे. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खतांच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत व योजना सुरू केल्या आहेत, खतांसाठी अनुदानाचाही निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी पत्राद्वारे केंद्राकडे मागणी केली आहे.