कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलिस खात्याने कंबर कसली असली तरीही आज, सोमवारी श्री गणेशाच्या आगमनावेळी राजारामपुरीत डॉल्बी रोखण्याची खरी परीक्षा पोलिस खात्याला द्यावी लागणार आहे. राजारामपुरीत पोलिसांनी आज डॉल्बीला रोखले नाही, तर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत मात्र त्याचे पडसाद दिसून येणार आहेत. गणेशोत्सवात पोलिस खात्याने सार्वजनिक मंडळांना डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर शहरातील अनेक नामवंत तालीम संस्थांनी ‘नो डॉल्बी’चा नारा दिला आहे. ‘नो डॉल्बी’साठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पुढाकार घेतला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस खात्यामार्फत डॉल्बीविरोधी जनजागृती करण्याचे गेले महिनाभर प्रयत्न सुरू आहेत. डॉल्बीमुळे प्रतिवर्षी विसर्जन मिरवणूक रेंगाळते; तसेच डॉल्बीचे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम आहेत. तरीही कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीदिवशी अनेक मंडळे डॉल्बीच्या भिंती उभ्या करतात. या मिरवणुकीत राजारामपुरीतील गणेशोत्सव मंडळांना वेळेवर प्रवेश मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून राजारामपुरीतील सर्व मंडळे श्री गणरायाच्या आगमनावेळीच डॉल्बी व अत्याधुनिक विद्युतरोषणाई करून करोडो रुपयांचा चुराडा करतात. त्यामुळे श्री गणेशाच्या आगमनावेळीच राजारामपुरी जनता बझारपासून आगमनाच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मंडळे सहभागी होत असल्याने कासवाच्या पावलाने पुढे सरकत ही मिरवणूक प्रतिवर्षी विसर्जन मिरवणुकीला साजेशी अशीच ठरते. पण, या वर्षी पोलिस प्रशासनाने डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक मंडळांनी जरी गणेशोत्सवात डॉल्बी लावणार नसल्याचे जाहीर केले असून, त्यांनी प्रत्यक्षात तसे कृतीत उतरविल्यास पोलिसांना यश मिळाले असे म्हणता येईल. त्यामुळे आज, सोमवारी राजारामपुरीत गणेशाच्या आगमनादिवशीच डॉल्बी रोखणे हेच खरे पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)
राजारामपुरीत आज पोलिसांची ‘डॉल्बीपरीक्षा’
By admin | Updated: September 5, 2016 00:43 IST