कोल्हापूर : १ सप्टेंबरपासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रकरणे आॅनलाईन होणार आहेत. पूर्र्वी पेन्शनसाठी वेगवेगळ्या पाच ते सहा अर्जांचे नमुने भरावे लागत होते. आॅनलाईन प्रणालीमध्ये आता एकच अर्ज नमुना भरावा लागणार आहे. हा अर्ज जबाबदारीने व काळजीपूर्वक भरा, वित्तीय अनियमितता घडू नये यासाठी दक्ष रहा, असे प्रतिपादन राज्याच्या प्रधान महालेखाकार मीनाक्षी मिश्रा यांनी मंगळवारी केले. प्रधान महालेखाकार मुंबई आणि लेखा व कोषागारे विभाग यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ‘पेन्शन’ या विषयावरील कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये मिश्रा यांनी पेन्शन अर्ज आॅनलाईन भरण्यासंबंधी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपमहालेखाकार नीलेश पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे, लेखाधिकारी शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.मिश्रा म्हणाल्या, पेन्शन प्रकरणे आॅनलाईन होणार असल्याने शासकीय कार्यालये तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वेळेची अणि श्रमांची बचत होण्यास मदत होणार आहे. आजचा कर्मचारी हा भविष्यात पेन्शनधारक आहे, याचे भान ठेवून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पेन्शन प्रकरणे काळजीपूर्वक आणि जबाबदारीने हाताळली पाहिजेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दुसऱ्या महिन्यांपासून पेन्शन मिळणे आवश्यक आहे; पण तरीही पेन्शन उशिरा मिळण्याची अनेक प्रकरणे जिल्ह्यामध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे ही कार्यशाळा आयोजित केल्याचे मिश्रा यांनी सांगितले. अप्पर जिल्हा कोषागार अधिकारी वर्षा परीट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नीलेश पाटील यांनी आभार मानले. प्रकरणे मार्र्गी लावा पेन्शन प्रशिक्षण कार्यशाळा व पेन्शन अदालत या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पेन्शन अदालतीमध्ये जावे लागू नये या पद्धतीने काम करा. शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपूर्र्वी सहा महिने पेन्शनसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमानुसार काम करून पेन्शन प्रकरणे वेळेवरच मार्र्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.
पेन्शन प्रकरणे १ सप्टेंबरपासून आॅनलाईन होणार
By admin | Updated: August 26, 2015 00:38 IST