कोल्हापूर : काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडूनही खऱ्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र ‘एटीएस’कडे द्यावा, अशी मागणी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौक येथे झालेल्या निर्दशनादरम्यान करण्यात आली.
काॅम्रेड पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरासमोरील रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ ला ते शहीद झाले. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१५ ला एका संशयिताला याप्रकरणी अटक करण्यात आली. मात्र, त्याच्या इतर साथीदारांना व मास्टरमाईंडला पोलिसांना पकडण्यात गेल्या साडेसहा वर्षांत यश आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा तपास यंत्रणेवरील विश्वास उडू लागला आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र एटीएसकडे हा तपास सुपूर्द करावा, अशी मागणी करण्यात आली. काॅम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, भारतीय संविधान जिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. राज्य सचिव नामदेवराव गावडे, शहर सचिव रघुनाथ कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाकपचे चंद्रकांत यादव, शेकापचे बाबूराव कदम, बी. एल. बर्गे, सुमन पाटील, सहसचिव गिरीश फोंडे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, एस. बी. पाटील, शाहीर सदाशिव निकम, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, इर्शाद फरास, शंकर काटाळे, आरती रेडेकर, हरिष कांबळे, कृष्णा पानसे, बाबा ढेरे, अनिल चव्हाण, संजय सदलगेकर, बळवंत पवार, एन. सी. पाटील,आदी उपस्थित होते.
फोटो : १९०८२०२१-कोल-एमकेपी
ओळी : कोल्हापुरात काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास एटीएसकडे द्यावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौकात गुरुवारी निदर्शने करण्यात आली.
(छाया : आदित्य वेल्हाळ)