कोल्हापूर : रोटरी क्लब आॅफ करवीर व महावीर महाविद्यालय यांच्यातर्फे ‘प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी’ या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २० डिसेंबरला सकाळी दहा वाजता महावीर महाविद्यालयात होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे स्वरूप, कारणे आणि उपायासंदर्भात मांडणी अपेक्षित आहे. खुल्या व महाविद्यालयीन या दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेसाठी अंतिम नावनोंदणी १८ डिसेंबरपर्यंत करता येईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. कणसे म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषणाविषयीचे युवापिढीचे वैचारिक आकलन, या नदीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यावर प्रकाश टाकणे, दर्जेदार भाषणे पुस्तक स्वरूपात प्रकाशित करून प्रदूषणमुक्तीचा जागर करणे, हा या वक्तृत्व स्पर्धेचा हेतू आहे. अधिक माहितीसाठी महावीर महाविद्यालय येथे संपर्क साधावा. यावेळी डॉ. अरुण पाटील, ‘रोटरी’चे अध्यक्ष हरिष पटेल, सचिव रत्नदीप तोडकर, इव्हेंट चेअरमन दिलीप शेवाळे, डिस्ट्रिक्ट आॅफिसर एस. एन. पाटील, विशाल जांभळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा जागर भाषणांतून
By admin | Updated: December 6, 2014 00:27 IST