शहापूर : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील घर व जमिनीच्या कारणावरून एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाचजणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबतची तक्रार अशोक धनपाल खूळ (वय ५४, रा. रुई, ता. हातकणंगले) यांनी दिली आहे. हा प्रकार २५ जुलैला घडला होता.
अजित रुक्माण्णा दुर्गन्नावर, मुकेश निवृत्ती कांबळे, अमोल निवृत्ती कांबळे, सागर कदम व रोहित नामदेव कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, अशोक हे आपल्या शेतामध्ये असलेल्या बंगल्यामध्ये गेले असता गुंडा कांबळे यांचे वरील सर्व जावई एकत्रित येऊन बंगल्यामध्ये घुसून येथे आमच्या सासऱ्याने काम केले आहे. आता हे घर व जमीन आम्हाला हवी आहे. ती आम्ही ताब्यात घेण्यासाठी काहीही करू, असे म्हणाले. त्यावेळी अशोक यांनी तुमचे सासरे मजुरीवर कामास होते. तुम्हाला कसलाच अधिकार नाही, असे म्हणाले असता वरील संशयितांनी तू आम्हाला कोण विचारणार, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन बंगल्यातून हाकलून काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.