प्रारुप मतदार यादीवर हरकतींची संख्या वाढत चालल्यामुळे प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयाकडे १७, शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडे १०, राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडे २७ तर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाकडे २५ हरकती दाखल झाल्या. मोठ्या संख्येने हरकती दाखल होत असल्याने याद्या तयार करताना प्रचंड घोळ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रारुप मतदार याद्या तयार करण्याकरिता नियुक्त केलेल्या बी.एल.ओ.नी प्रभाग रचनेचा नीट अभ्यास केला नसल्याची बाब समोर येत आहे. हद्दी माहीत करून घेतल्या नसल्यामुळे एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात पाचशे ते पंधराशे मतदारांची नावे गेली आहेत.
माजी नगरसेवक अनिल कदम यांनी दिलेल्या हरकतीनुसार प्रभाग क्रमांक ३९ राजारामपुरी एक्स्टेंशन व प्रभाग क्रमांक २४ साईक्स एक्स्टेंशन या प्रभागातील अनुक्रमे ६५८ व ५०१ असे एकूण ११५९ मतदार प्रभाग क्रमांक ३८ टाकाळा खण-माळी कॉलनीच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. टाकाळा खण-माळी कॉलनी प्रभागात वाढलेले मतदार संख्या कमी करावीत, अशी मागणी कदम यांनी महापालिका प्रशासकांकडे केली आहे.
जेवढ्या हरकती जास्त येतील तेवढा वेळ त्या दुरुस्त करण्याकरिता लागणार आहे. मंगळवार (दि. २३) अखेर हरकती येणार असून त्यांची व्याप्ती किती असेल याचा अंदाज आता येऊ लागला आहे. अंतिम यादी करण्याच्या कामास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.