विनायक शिंपुकडे
इचलकरंजी : कोरोना महामारीशी लढताना आशा सेविका यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. घरोघरी जाऊन आशा सेविकांनी सर्वेक्षण केले. स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून लढणाऱ्या या कोरोना योद्ध्यांकडे नगरपालिकेने मात्र दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नगरपालिकेने आशा सेविकांचे मानधनच दिलेले नाही. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा उद्विग्न सवाल आशा सेविकांना पडला आहे.
कोरोना विषाणूमुळे २३ मार्च २०२० पासून देशासह राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. इचलकरंजी शहरातही कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २८ फेब्रुवारी पासूनच आशा सेविकांनी शहरात सर्वेचे काम सुरू केले होते. सध्या शहर व परिसरात ११५ आशा सेविका आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आशा सेविका ओळखल्या जातात. जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा सेविका मध्यस्थीचे काम करतात. गैर-आदिवासी भागात १५०० लोकसंख्येमागे एक आशा सेविका नियुक्त केलेल्या आहेत. परंतु इचलकरंजी शहरात हे प्रमाण कमी आहे. अपुऱ्या साधनांमध्येही आशा सेविकांनी स्वत:सह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन संशयित, कोरोनाबाधितांच्या नोंदी घेत आहेत. नोव्हेंबर २०२० पासून ते एप्रिल २०२१ पर्यंतचे मानधन नगरपालिकेकडून अद्यापही मिळालेले नाही. कोरोना सारख्या कठीण काळातही हक्काचे मानधन मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ही आर्थिक पिळवणूक असल्याचा रोष आशा सेविकांनी व्यक्त केला.
चौकट वस्त्रनगरीची जबाबदारी ११५ आशा सेविकांवर
शहर व परिसराची लोकसंख्या साधारण साडेतीन लाखांच्या आसपास आहे. तसेच हद्दही मोठी आहे. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्या व हद्द असलेल्या शहराची जबाबदारी केवळ ११५ आशा सेविकांवर आहे. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडचणी येतात.
प्रतिक्रिया
कोणत्याही प्रकारच्या तक्रारी न करता आहे त्या परिस्थितीत आशा सेविका आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यांच्या प्रामाणिक कामाचे दाम लवकर मिळावे, हीच अपेक्षा आहे.
नंदिनी करडे, सुपर वायझर
कोरोनासारख्या कठीण काळातही आशा सेविकांनी प्रामाणिक काम केले आहे. तरीही नगरपालिकेने त्यांचे मानधन थकविले आहे. त्वरित त्यांना मानधन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल.
सदा मलाबादे, कामगार नेते