कागल : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोकसभा आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी निषेध सभा, अशा संयुक्त सभेचे आयोजन शुक्रवारी कागल शहरात करण्यात आले होते. शाहू नगरवाचनालयात झालेल्या या सभेसाठी शहरातील प्रमुख सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गाडे होते.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भैया माने यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव पाटील, मराठा महासंघाचे किरण मुळीक, शिवसेनेचे राहुल घोरपडे, किरण कुलकर्णी, प्रा. मोहन तोरगलकर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अतुल जोशी, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत गवळी, शाहू आघाडीचे सचिव मनोहर पाटील, पक्षप्रतोद रमेश माळी यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी आभार मानले. उपस्थित वक्त्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी विचारांची शक्ती संपविण्याचे कटकारस्थान असल्याचे सांगून हल्लेखोरांना त्वरित पकडावे, अशी मागणी केली. या सभेला बाळ पाटील, रघुनाथ जकाते, कागल बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, आशाकाकी जगदाळे, शिवराज्य मंचचे इंद्रजित घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते. ( प्रतिनिधी )ुविवेकपणा संपला़?प्रकाश गाडेकर आणि इतर काही वक्त्यांनी कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संदर्भ देत सांगितले की, हल्ला झाल्याच्या घटनेनंतर निषेधासाठी कागलमधून तत्काळ प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या. कारण ही शाहूंची जन्मभूमी आहे. मात्र, इतक्या उशिराने निषेध सभा आपण घेत आहोत, हे दुर्दैवी आहे. यामुळे कागलकरांमधील विवेकपणा संपला आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो.
कागलमध्ये निषेध, शोकसभा
By admin | Updated: February 20, 2015 23:09 IST