लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवणे हे अत्यंत चुकीचेच आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये केलेला हस्तक्षेप आहे. या निर्णयामुळे ज्यांची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने कमी केली होती, त्या नेत्यांना (माजी मुख्यमंत्री नारायण राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील) चांगली झोप तरी लागेल. काहींना उगाचच पोलिसांचा जथ्था सोबत घेऊन फिरायची भारी हौस असते, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
पवार म्हणाले, ज्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, तो राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे घेतलेला निर्णय होता. मात्र, असे असताना केंद्राने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविणे हे जरा गंमतीशीरच आहे. मलाही त्याचे आश्चर्य वाटले. त्या संबंधित नेत्यांनी त्याची मागणी केली असेल. आता सुरक्षा व्यवस्था मिळाल्याने त्यांना चांगली झोप लागेल.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ पवार यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार उपस्थित होते. पवार यांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामधामवर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. विविध निवेदने देण्यासाठी तर मोठी रांगच लागली होती.