कोपार्डे : नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग करवीर तालुक्यातील शिये - पळवाडीतून जाणार असून, यामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या पर्यायी रेखांकनासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला भाग पाडू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. शिये व भुये येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या कृती समितीने खा. संभाजीराजे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे सदस्य कृष्णात पोवार उपस्थित होते. महापुरावेळी या महामार्गाच्या प्रस्तावित रेखांकन परिसरात दोन किलोमीटरपर्यंत पाणी आले होते. भविष्यात जर या महामार्गासाठी भराव टाकला तर कोल्हापूर शहर व लगतच्या गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे. या महामार्गामुळे चारशे शेतकऱ्यांची ३५० एकर सुपीक जमीन राष्ट्रीय महामार्ग संपादित करणार असल्याने येथील बहुतांश शेतकरी हे भूमिहीन व बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे या महामार्गासाठी सध्याच्या रेखांकनाप्रमाणे होणारे भूसंपादन थांबवून पूर्वीच्या रेखांकनानुसार भूसंपादन करावे, अशी मागणी संभाजीराजे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी बाजीराव पाटील, अभिजीत पाटील, राजेश पाटील, जयसिंग पाटील उपस्थित होते.
220921\img-20210921-wa0118.jpg
करवीर तालुक्यातील शिये भुये दरम्यानच्या सध्याचे भूसंपादन थांबवून पुर्वीच्या रेखांकनानुसार करण्याच्या मागणीचे निवेदन खा. संभाजी राजे यांना कृती समितीने दिले यावेळी राजेंद्र पाटील कृष्णात पोवार व इतर