कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी पोलिसांना सापडले असून, त्यांची नावे जाहीर करण्यास राज्य सरकार प्रतिबंध करत आहे, असा गौप्यस्फोट करणाऱ्या माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची ‘एसआयटी’चे विशेष पथक चौकशी करेल. मारेकरी सापडलेत तर त्यांना ठेवले कोठे? याबाबत सखोल माहिती त्यांच्याकडून पथक घेईल, त्यांनी नांवे जाहीर केल्यास राज्य शासनाने जाहीर केलेले २५ लाख रुपयांचे बक्षीस त्यांना दिले जाईल असे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी स्पष्ट केले. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी सकाळी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या विधानानंतर वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त झळकल्याने राज्यात खळबळ उडाली. मारेकऱ्यांची नावे लपवून ठेवण्यामागे राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा हात असल्याच्या मुश्रीफ यांच्या विधानाने नागरिकांतून संतापाची लाट उसळली. याप्रकरणी मारेकरी सापडले आहेत का, याची चौकशी एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांच्याकडे केली असता त्यांनी मुश्रीफ हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना जे वाटले ते त्यांनी बोलून दाखविले. परंतु मारेकरी सापडले असतील तर त्यांना ठेवले कोठे? आणि लपविण्याचा काहीच संबंध येत नाही. मुश्रीफ यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’चे विशेष पथक पाठविण्यात येईल. त्यांना कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आणि मारेकरी कोठे लपविले याबाबत त्यांनी सखोल माहिती द्यावी. चौकशीस मुश्रीफ यांनी सहकार्य करावे. (प्रतिनिधी) मंगळवारी विधानसभेत बोलू : मुश्रीफ दरम्यान आपण शुक्रवारी केलेल्या विधानावर आजही ठाम असून मंगळवारी (दि.२८) आपण विधानसभेत त्यासंबंधीची माहिती सभागृहात देवू असे आमदार मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुश्रीफ यांच्या विधानाची चौकशी करणार
By admin | Updated: July 26, 2015 00:42 IST