हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी नगरपालिका कृती समितीच्यावतीने सुरू केलेले बेमुदत उपोषण बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शेकडो रौप्यनगरीवासीयांनी घंटानाद आंदोलन केले. आज, गुरुवारी शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांबाहेर निदर्शने करून कार्यालये बंद पाडणार आहेत. तसेच उद्या, शुक्रवारपासून बेमुदत गाव बंद आंदोलनाचा इशारा कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ यांनी दिला. बुधवारच्या घंटानाद आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, समाज कल्याण सभापती किरण कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, दौलतराव पाटील, अमजद नदाफ, सहनिबंधक बाळासाहेब कांबळे, प्रतापसिंह देसाई, आदींनी सहभाग घेतला. शहरातील राजकीय पक्ष, संघटना, मंडळे, उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. दरम्यान, कृती समितीच्यावतीने गेले पंधरा दिवस साखळी उपोषणाबरोबरच दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले असतानाही तहसीलदार दीपक शिंदे यांच्या व्यतिरिक्त अधिकाऱ्याने उपोषणस्थळी येण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.अशोक खाडे, मनोज पाटील, विलास चव्हाण, पृथ्वीराज गायकवाड, मच्छिंद्र परीट, महादेव पाटील, आनंदा कांबळे, विनोद खोत, डॉ. सुभाष मधाळे, अमोल देशपांडे, शहाबुद्दीन घुडूभाई, आदींचा उपोषणामध्ये सहभाग आहे.
नगरपालिकेसाठी हुपरी घंटानादाने दुमदुमली
By admin | Updated: July 30, 2015 00:46 IST