राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात विद्युत अपघातामुळे तब्बल शंभर जणांचा बळी गेला आहे. यापैकी वीस अपघातामध्येच महावितरण जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी सातजणांना आर्थिक मदत महावितरणकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे केवळ ६१ अहवाल विद्युत निरीक्षकांचे आलेले आहेत. विजेच्या धक्क्याने ६५ प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे.
विजेच्या धक्क्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात व घरगुती वीज धक्क्याच्या घटना आपण रोज पाहतो. विजेच्या धक्क्यात केवळ मनुष्यहानी होते असे नाही तर पशुहानी व पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. गेल्या तीन वर्षांत विजेच्या धक्क्याने शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ६१ जणांचे अहवाल विद्युत निरीक्षकाकडून आले आहेत. त्यापैकी ४१ प्रकरणात महावितरण जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले असून, सात जणांनाच २६ लाखांची आर्थिक मदत मिळाली आहे.
तीन वर्षांचा आढावा घेतला तर सरासरी २२ अपघात हे प्राण्याचे झाले आहेत. यापैकी ४५ प्रकरणांचे अहवाल महावितरणकडे प्राप्त झाले असून, ३९ प्रकरणात महावितरण जबाबदार आहे. आठ प्रकरणात तीन लाख ६ हजार रुपयांची मदत संबंधित पशुपालकाला मिळालेली आहे. शॉर्टसर्किटमुळे उभ्या पिकांना आगी लागण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडतात. गेल्या तीन वर्षांत २२६ ठिकाणी पिकांना आगी लागल्या आहेत. यापैकी १४१ ठिकाणी महावितरण जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत मिळू शकलेले नाही.
भरपाई मिळण्याची प्रक्रिया अशी -
महावितरणचे विद्युत निरीक्षक घटनास्थळ जाऊन पाहणी करतात. घटनेचा अहवाल तयार करून ते महावितरणला सादर करतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पंचनामा, व्यक्ती अथवा प्राण्याच्या शवविच्छेदन अहवालासह महावितरणकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. त्याची छाननी होऊन यामध्ये महावितरण जबाबदार असेल तरच भरपाई मिळते.
३७ जणांकडून अर्ज अप्राप्त
व्यक्ती, जनावरांसह पिकाच्या नुकसानीबाबत शंभरपैकी ३७ जणांनी महावितरणकडे प्रस्तावच दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे विद्युत निरीक्षकाच्या अहवालावरच भरपाईचे भवितव्य अवलंबून असते.
गेल्या तीन वर्षांतील विजेच्या धक्क्याच्या घटना
वर्ष व्यक्ती प्राणी पिके
२०१८-१९ ४१ २१ १०१
२०१९-२० ३४ २२ ९३
२०२०-२१ २५ २२ ३२