इचलकरंजी : दिल्ली येथे विविध राज्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून शेतीविषयक कायदे रद्द करावे, अशा मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यात फूट पाडण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याच्या निषेधार्थ शहरात विविध संघटनांच्यावतीने निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. कृषी विधेयक नवे धोरण रद्द करावे व शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी; अन्यथा देशभरात आंदोलन सुरू आहे त्याची तीव्रता वाढवावी लागेल, असा इशारा दिला. निदर्शनामध्ये हणमंत लोहार, मारुती आजगेकर, शिवाजी जाधव, शशिकांत सदलगे, दादासाहेब जगदाळे, आदी सहभागी झाले होते.
येथील कामगार संघटना संयुक्त कृती समिती व अन्य संघटनेच्यावतीने के. एल. मलाबादे चौकात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शने व रास्ता रोको केला. २६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने लाठीमार केला तसेच पाण्याचा मारा करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायदे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत, असे म्हणत आहेत, अशी टीका केली. निदर्शनामध्ये सदा मलाबादे, दत्ता माने, ए. बी. पाटील, सुभाष कांबळे, शिवगोंडा खोत, आदी सहभागी झाले होते.
(फोटो ओळी)
०३१२२०२०-आयसीएच-०२
इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने के. एल. मलाबादे चौकात रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली.
(छाया-उत्तम पाटील)