लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मेघोली धरण फुटल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची असून, त्यादृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे. सरकारने संबंधितांना तात्काळ मदत द्यावी, यासाठी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची लवकरच भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले.
मेघोली प्रकल्प या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला हाेता. मात्र, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे हेच वरदान जीवावर बेतले आहे. २०१८ पासून प्रकल्पाच्या व्हॉल्व्हला गळती लागली होती. लोकांनी अनेकवेळा तक्रारी करून त्याकडे लक्ष दिले नाही. त्याची किंमत येथील शेतकऱ्यांना मोजावी लागली. यातून शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. धरण फुटल्यानंतर पाटबंधारे विभागाने काहीतरी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारी झटकली आहे. मेघोली धरणफुटीची सरकारने सखाेल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.