कोल्हापूर: पावसाळा तोंडावर असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या संदर्भात आगाऊ नियोजनासाठी म्हणून कोल्हापुरात कोल्हापूरसह सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांची आज सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह तीन जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता उपस्थिती राहणार आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्याबरोबरच अलमट्टीसंदर्भातही धोरण ठरणार आहे.
कोल्हापूरसह सांगलीला सलग दोन वर्षे महापुराचा जोरदार फटका बसला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तीव्रता कमी होती. याला कारण धरणातील पाण्याचे केलेले काटेकोर नियोजन हे होते. ऑगस्टमध्ये जास्त पाऊस गृहीत धरून जून-जुलैमध्येच धरणातील पाणीसाठा कमी ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्याचे परिणामही चांगले आले. यावर्षी देखील असेच नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. मे महिन्यात पाण्याची मागणी वाढते, पण यावर्षी संपूर्ण मे महिन्यात चार-आठ दिवसांच्या अंतराने वादळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचीही पाण्याची मागणी घटली परिणामी लघू प्रकल्पांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, वारणा या मोठ्या धरणांमध्ये अजूनही ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. यावर्षी माॅन्सून चांगला बरसणार असल्याचा हवामान अंदाज पाहता जुलैमध्ये धरणे शंभर टक्के भरण्याचा धोका आहे. त्यामुळेच गतवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आजच्या बैठकीत मांडला जाणार आहे.
कोल्हापूर, सांगलीतील भीषण महापुरास अलमट्टीच्या पाण्याच्या फूग कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. महापुराच्या अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीने हा आरोप फेटाळून लावला असला तरी महापूर आणि अलमट्टी हे समीकरण घट्टच बसले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू आधीपासून अलमट्टीच्या पाणी नियोजनावरून वादाला सुरुवात होते. राज्य सरकारने मंत्रालय पातळीवर कर्नाटक राज्याशी समन्वय साधण्यासाठी सचिव पातळीवर नियंत्रण समिती नेमली आहे. त्याचीही अजून बैठक झालेली नाही. पण आज होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावर देखील प्राधान्याने चर्चा होणार आहे.