कोल्हापूर : राज्यातील आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉँग्रेसने अनेक समाजाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यांचे मार्केटिंग करून जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आज, बुधवारी कोल्हापुरात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील होते. आ. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, देशभरात मोदी नावाची लाट आली होती, अशा वादळात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांना विजयी करत वादळातही दिवा लावला. संपूर्ण राज्यात असा निकाल लागेल, असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. लोकांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत होती. त्याचा अभ्यास करून भाजपने प्रचारयंत्रणा जोरात राबवली. आपले कार्यकर्ते मार्केटिंगमध्ये कमी पडले. केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना राबविल्या. त्यांचे मार्केटिंग योग्य पद्धतीने होऊ शकले नाही. आगामी काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. त्याचबरोबर अल्पसंख्याक, जैन व धनगर समाजाचेही प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठीही पावले उचलावी लागतील. लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे करा, तरच विधानसभेला हे वातावरण बदललेले दिसेल, असेही ते म्हणाले. आ. पाटील म्हणाले, भाजपच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत देशातील वातावरणाला छेद देण्याचे काम महाराष्ट्रातील मतदार करतील. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. संग्राम कुपेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महापौर सुनीता राऊत, नामदेवराव भोईटे, प्रा. एस. डी. पाटील, धैर्यशील पाटील-कौलवकर, अशोक स्वामी, संगीता खाडे, ए. वाय. पाटील, बाबूराव हजारे, मधुकर जांभळे, आप्पासाहेब धनवडे, अरुण इंगवले, आदी उपस्थित होते. माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दहा कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल माणगाव ग्रामस्थांच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ व आमदार के. पी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या कामाचे मार्केटिंग करा
By admin | Updated: June 12, 2014 01:04 IST