गारगोटी : एकतीस डिसेंबर रोजी भुदरगड किल्ल्यावर मद्यपींना मज्जाव करण्यासाठी किल्ले भुदरगड प्रतिष्ठानतर्फे सालाबादप्रमाणे मशाल गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक व कलनाकवाडीचे सरपंच रविराज निंबाळकर यांनी दिली. या अभियानात भुदरगड तहसील विभाग, पोलिस, वनविभाग, समस्त गडकरी व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सहभागी होणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली भुदरगड भूमी व त्यामध्ये गडकिल्ल्यांचे वैभव लाभलेला भुदरगड किल्ला सर्वत्र परिचित आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गडाच्या माथ्यावर चारचाकी वाहने जाऊ शकणारा एकमेव असा हा गड आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेला, भल्या मोठ्या प्रमाणावर तलावात पाणी उपलब्ध असणारा हा किल्ला आहे. इथल्या पाण्याला अवीट गोडी आहे. कारण हे पाणी संपूर्णत: प्रदूषणमुक्त आहे. अशा या गडावर नववर्षाचे स्वागत करण्याचे निमित्त करून अनेक हौशी पर्यटक येतात. भरपूर दारू पिऊन डीजे लावून रात्रभर धिंगाणा घालतात, पण गेल्या काही वर्षांपासून किल्ले भुदरगड प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री मशालीच्या उजेडात गस्त घालण्याचे ठरविले. त्याला पोलिस, वनविभागाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर गडावर गस्त सुरू झाली. शाकाहारी जेवण करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत; परंतु नशा करून मांसाहार करण्यावर कडक निर्बंध आहेत. सध्या या मोहिमेत आजूबाजूला गडावर राहणाऱ्या गडकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिवसेंदिवस लोकजागृती झाल्यामुळे मद्यपींनी गडाकडे पाठ फिरवली आहे.सध्या परिस्थिती पाहता हे गडकिल्ले म्हणजे मद्यपींना मेजवानी करण्याचे अड्डे बनत चालले आहेत. कोणतीही शासकीय सुटी असो किंवा ३१ डिसेंबर, या गडकिल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ माजविणाऱ्यांचे प्रस्थ वाढत चालले होते. यातून गडांची नासधूस होत असून दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, पेपर यांचा खच पडलेला असतो. यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. त्यामुळे किल्ल्यांचे वैभव नष्ट होत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी पोलिस व वनविभागाच्या कार्यालयातर्फे या मद्यपींवर तसेच गडांवर चालणाऱ्या पार्टीवर बंधन घालण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून असे गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गडकऱ्यांकडून अशा महाभागांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. (प्रतिनिधी)इतिहासाला काळिमा फासण्याचे कृत्य करू नयेइतिहास संशोधक रविराज निंबाळकर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी रक्त सांडून गडकोटांचे साम्राज्य उभे केले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही इतका देदीप्यमान इतिहास पहायला मिळत नाही. आपल्या गैरवर्तणुकीमुळे इतिहासाला काळिमा फासेल, असे गैरकृत्य कोणीही करू नये. कारण आपल्या इतिहासाचे पावित्र्य नष्ट होऊ नये. १८४४ साली स्वातंत्र्यसंग्रामातील पहिली तोफ याच गडावरून डागली होती, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
‘लोकमत’च्या मेहरून नाकाडे ‘तंटामुक्त’मध्ये राज्यात प्रथम
By admin | Updated: December 29, 2016 23:02 IST