दोन वर्षांपूर्वी जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंदे यांच्या घराशेजारी बांधावर असणाऱ्या विजेच्या खांबाजवळजी माती वाहून गेली असून, खांब पडण्याच्या स्थितीत आहे.
शेजारच्या लोकांनी धोका लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी खांबाला दोरीने बांधून तात्पुरता आधार दिला होता. दोरी आता पावसाने सडली असून, खांब पडण्याच्या स्थितीत आहे.
पिंपळगाव आणि गारगोटी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार देखील स्थानिक लोकांनी दिली आहे. याची साधी दखल देखील घेतली नाही. तसेच महावितरणच्या पोर्टलला ऑनलाईन तक्रार केली होती. मात्र, कोणतीही कार्यवाही न करता समस्या सोडवली असा मेसेज पोर्टलवर दाखवत आहे. स्थानिक लोकांनी जोपर्यंत खांब दुसऱ्या जागी बसवत नाही किंवा खांबाला वढणी लावून आधार दिला जात नाही, तोपर्यंत लाईट बिल न भरण्याचा निर्णय घेतला होता; पण शिंदे कुटुंबीयांचे लाईट कनेक्शन बंद केले होते. आधी बिल भरा असा तगादा अधिकारी आणि कर्मचारी यांनी लावला होता. बिल भरून देखील कामाची पूर्तता झाली नाही. लोकांच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन खांबांची जागा बदलावी किंवा ओढणी लावून कायमस्वरूपी आधार द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.