लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. तब्बल २८७३ क्विंटल भाज्यांची आवक झाली असून, तेवढ्या सगळ्या भाज्यांचा उठावही झाला. दरात मात्र थोडी वाढ झाली आहे. कांदा, बटाट्यासह फळांची आवकही सोमवारी वाढली.
राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामधून भाजीपाला, दूध, फळे आदी जीवनाश्यक गोष्टींना सवलत देण्यात आली होती. तरीही लॉकडाऊनमुळे भाजीमंडई, आठवडी बाजार बंद राहिल्याने भाजीपाल्यासह फळांच्या विक्रीवर परिणाम झाला. भाजीचा उठाव झाला नाहीतर काय करायचे? या भीतीपोटी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची तोडच केली नाही. त्यामुळे शनिवारी बाजार समितीत नियमित आवकेच्या २५ टक्के तर रविवारी अवघी ५ टक्केच भाजीपाल्याची आवक झाली.
सोमवारी, मात्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. बाजार समितीत साधारणत: २५०० क्विंटल भाजीपाल्याची आवक हाेते. मात्र दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर २८७३ क्विंटल आवक झाली. आवक वाढली असली तरी त्या पटीत मागणीही वाढल्याने दरात थोडी वाढ झाली. किलोमागे एक-दीड रुपयांनी भाजीपाला महागल्याचे दिसले. कांदा, बटाट्याची आवकही वाढली. सोमवारी १८ हजार ५५२ पिशव्या कांद्याची आवक झाली. फळांचीही ५७० क्विंटल आवक राहिली.
‘गोकुळ’ची १३ लाख लिटर विक्री
लॉकडाऊनमुळे हाॅटेल, चहाच्या टपऱ्या बंद होत्या. त्यामुळे मुंबई, पुणे व काेल्हापुरात ‘गोकुळ’च्या दूध विक्रीवर काहीसा परिणाम झाला. दोन दिवस साधारणत: १ लाख ८० हजार लिटर दूध कमी गेले. मात्र आज, गुढीपाडव्याचा सण आणि दोन दिवसांनंतर सुरू झालेल्या व्यवहारामुळे तब्बल १३ लाख लिटर दुधाची विक्री झाल्याची माहिती ‘गोकुळ’चे मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील यांनी दिली.