कोल्हापूर : ओसाका (जपान) येथे १८ ते १९ नाेव्हेंबर दरम्यान ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ५ ते १५ नोव्हेंबर दरम्यान कोलकत्त्याच्या साई नेताजी सुभाष ईस्टर्न सेंटरमध्ये भारतीय रग्बी संभाव्य १७ जणींच्या भारतीय संघाचे शिबीर आयोजित केले आहे. या संघात कोल्हापूर (पाडळी खुर्द)च्या वैष्णवी पाटील व कल्याणी पाटील या ग्वर्णी लागली आहे.भारतीय महिला रग्बी संघाने चीन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. यात या दोघांनीही चमकदार खेळ केला होता. या कामगिरीची दखल घेत रग्बी इंडियाच्यावतीने या दोंघींची भारतीय संभाव्य संघाच्या निवड शिबीरासाठी निवड केली. या दोघी रविवारी कोलकत्याला पोहचल्या. शिबीरासाठी १७ जणांची निवड केली आहे. विशेष म्हणजे या महिलांच्या रग्बी संघात हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगालचा खेळाडूंचा वरचष्मा आहे. त्यात महाराष्ट्राच्या पाचजणींची निवड झाली आहे. यात वैष्णवी, कल्याणी शिवाय आकांक्षा कटकडे, उज्वला घुग, व्हाबीज भरूचा यांचाही समावेश आहे. सतराजणींच्या संघाची घोषणा रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहूल बोस यांनी केली आहे. कल्याणी, वैष्णवीला राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.