कोल्हापूर : रेल्वेचा अर्थसंकल्प म्हटले की, कोल्हापूरबाबत निव्वळ काही मार्गांचे सर्वेक्षण किंवा एखाद्या नव्या गाडीची घोषणा इतकेच काय ते पदरात पडायचे; पण यावर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सकारात्मक निर्णयामुळे सर्वेक्षणाच्या पुढे जात प्रत्यक्षात सेवा सुरू होण्याच्या दिशेने रेल्वे हलली आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या मंजुरीने समाधान व्यक्त होत आहे. शिवाय कोल्हापूरसह कोकणच्या विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाने गगनबावडा तालुक्याचा विकास होणार असून, तो पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळक होईल. शिवाय रोजगार निर्मिती वाढणार आहे. सपाट प्रदेशात नवा रेल्वेमार्ग तयार करताना प्रत्येक किलोमीटरला साधारणपणे आठ कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र, डोंगरी भागातून रेल्वेमार्ग तयार करताना तो प्रतिकिलोमीटर साधारणपणे ३० कोटी रुपयांपर्यंत जातो. त्यानुसार कोल्हापूर ते वैभववाडी या १०७ किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गासाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडल्याने व्यापार, उद्योग व पर्यटनात मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. देशभरातील लाखो भाविक करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनानिमित्त कोल्हापूरला भेट देतात. कोकणचे सौंदर्य पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात जातात. हा रेल्वेमार्ग होणार असल्याने दोन्ही ठिकाणच्या पर्यटनवाढीला मदत होणार आहे. सहज, सोपी, सुरक्षित वाहतूक कोल्हापुरातून कोकणमार्गे गूळ आणि साखरेची मोठी निर्यात होते. कोल्हापुरातील भाजी, गूळ, दूध, मैदा, आदींसाठी कोकणातून मोठी मागणी आहे. रेल्वेमार्ग झाल्यास हा माल अगदी सहज व कमी खर्चात कोकणात पोहोचणार आहे. कोकणातील बॉक्साईट व जलमार्गे देशभरातून येणारा विविध माल कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात रस्तामार्गानेच पुरविला जातो. यात तेल, खनिज पदार्थांचा मोठा वाटा आहे. रेल्वेमार्ग झाल्याने ही वाहतूक सोपी, सुरक्षित होईल. अरबी समुद्रापर्यंत रेल्वेचे जाळे कोल्हापुरातून दररोज रेल्वेला किमान ५० लाख रुपयांचा व्यवसाय मिळतो. कोल्हापूरला काही नवे देताना मात्र रेल्वे प्रशासन हात आखडता घेते. कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडल्याने विशाखापट्टणम्पासून बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रापर्यंत रेल्वेचे जाळे अल्प खर्चात उभे करता येण्यासारखे आहे. कऱ्हाड-बेळगावचा विचार नाही या अर्थसंकल्पात कऱ्हाड-कोल्हापूर-बेळगाव या मार्गाची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, या मार्गाचा यंदा सरकारने विचारच केलेला नाही. कऱ्हाड-बेळगाव हा कऱ्हाड - शेणोली - वाळवा- इस्लामपूर-आष्टा- नेज - निपाणी-कणगला-संकेश्वर-हलकर्णी-दड्डी- काकती-सांबरा - बेळगाव असा प्रस्तावित मार्ग आहे. सुमारे १९१ किलोमीटरच्या या मार्गाचे मध्य रेल्वेने गेल्या दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले आहे. यासाठी २१०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या सर्वेक्षण विभागाने रेल्वे महामंडळाला सादर केला आहे. या रेल्वेमार्गाने धारवाड ते कऱ्हाडपर्यंतच्या ३४ साखर कारखान्यांसह बेळगाव, कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतींना बळ मिळणार होते. मात्र, या मार्गाबाबत विचारच केलेला नाही. विजयदुर्ग बंदर जोडले जाणार? भविष्यात कोल्हपूर-वैभववाडी हा रेल्वेमार्ग विजयदुर्गपर्यंत विस्तारित केला जाऊ शकतो. त्याद्वारे विजयदुर्ग बंदर जोडले जाऊ शकते. तेथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे. माझ्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान कोल्हापूर-वैभववाडी या कोकणला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची गेल्या दोन दशकांपासून कोल्हापूरकरांची मागणी होती. निवडणुकीतही माझा हा ‘ड्रीम प्रकल्प’ होता. त्याच्या मंजुरीसाठी मी अनेकवेळा पाठपुरावा केला. गतवर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कोल्हापूरला आले त्यावेळी त्यांच्यासोबत बैठक घेऊन या रेल्वेमार्गाचे महत्त्व पटवून दिले. त्यावेळी या मार्गाची पाहणी करून आराखडा तयार करण्याचे आदेश प्रभू यांनी दिले होते. त्यानंतर या पाठपुराव्यासाठी किमान चार बैठका घेण्यात आल्या. त्याचा अहवाल पूर्ण करून गेल्याच महिन्यात तो रेल्वे महामंडळाकडे दिला. त्यामुळे कोल्हापूरकरांचे कोकणला कोल्हापूर रेल्वेमार्गाने जोडण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच नेते शरद पवार यांचे विशेष आभार मानतो. हा प्रकल्प साकारल्याने कोल्हापूरच्या महसुलात मोठी वाढ होणार आहे तसेच माझ्या मतदारसंघात गगनबावडा तालुका येत असल्याने या तालुक्याचाही त्यामुळे विकास साधणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी मांडलेल्या बजेटवर मी समाधानी आहे. या एका रेल्वे प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या विकासात भरच पडेल. - धनंजय महाडिक, खासदार रुकडी, मिरज-अर्जुनवाड दरम्यान उड्डाणपूल मंजूर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग तसेच रुकडी (ता. हातकणंगले) व मिरज-अर्जुनवाड दरम्यान उड्डाणपूल मंजूर केला. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे २ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे भेट घेऊन कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात अनेक मागण्या केल्या होत्या. यावेळी त्यांनी या मागण्या लवकरच मंजूर करू, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी रेल्वेच्या सक्षमीकरणाला बळकटी देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. रुकडी (ता. हातकणंगले) येथे उड्डाणपूल करण्यात यावा, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच मिरज-अर्जुनवाड येथील गेटजवळ उड्डाणपूल मंजूर झाल्यामुळे येथील मार्गदेखील सुकर होणार आहे. वैभववाडी ते कोल्हापूर या मार्गासाठी २००९ पासून तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून पाठपुरावा सुरू होता. या मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. - राजू शेट्टी, खासदार
कोल्हापूर रेल्वेला मिळणार ‘वैभव’
By admin | Updated: February 26, 2016 01:24 IST