कोल्हापूर : उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. कोरोनामुळे थांबलेली ही दीक्षाभूमी एक्स्प्रेस अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली. त्यातून पहिल्यादिवशी १९३ जणांनी प्रवास केला. त्यात कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर येथील प्रवाशांचा समावेश होता.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ही रेल्वे सुटली. मिरज, कुर्डुवाडी, पंढरपूरमार्गे दुपारी तीनच्यासुमारास रेल्वे लातूरमध्ये पोहोचली. ठिकठिकाणी प्रवासी समिती सदस्यांनी तिचे स्वागत केले. परळी-वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूर, इटारसी, गया, जबलपूर, पारसनाथमार्गे ही रेल्वे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास धनबादला पोहोचणार आहे. धनबाद येथून दर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता ही रेल्वे निघणार असून, आलेल्या मार्गाने परतीचा प्रवास करत बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास कोल्हापूरला पोहोचणार आहे. या रेल्वेला १९ डबे आहेत. त्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करणे आवश्यक आहे.
चौकट
कोल्हापूर-अहमदाबाद, दिल्ली सुरू व्हावी
कोल्हापूर-धनबाद मार्गावर गेल्या तीन वर्षांपूर्वी रेल्वे सुरू झाली. कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून तिची सेवा स्थगित करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मध्य रेल्वेने विशेष रेल्वे म्हणून ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू केली. त्याला प्रवाशांंचा चांगला प्रतिसाद आहे. या रेल्वेमुळे काशी, गया, पारसनाथ, पंढरपूर, बार्शी, शेगाव आणि देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. आता कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-दिल्ली रेल्वेही लवकर सुरू करावी, अशी मागणी पुणे रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी केली.