गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील गायरानमधील ४४ प्लॉटधारकांचा विषय न्यायालयीन प्रक्रियेने प्रलंबित झाला होता. या प्रकरणाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने आमदार प्रकाश आबिटकर यांनी याविषयी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, लवकरच प्रांताधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
सन १९९० मध्ये पिंपळगाव येथील गावचे क्षेत्र कमी पडत असल्याने गावठाणवाढ करत गावातील गरीब व गरजू लोकांना राहण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत शासकीय योजनेमधून गावच्या गायरान जागेवर ग्रामपंचायतीने प्लॉट पाडून रीतसर ४४ जणांना प्लॉट मंजूर केले होते. त्यावेळी एका ग्रामस्थाने यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल काय लागेल या भीतीपोटी अनेकांनी प्लॉट मंजूर होऊनही येथे घरे बांधणे टाळले. यातील आठ लाभार्थिंनीच घरे बांधली. त्यांची घरे ग्रामपंचायतीकडून नावावर झाली, तर ३६ जणांनी घरे बांधलेली नाहीत. आता न्यायालयाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हे मंजूर प्लॉट सातबारा पत्रकी नोंद होऊन कब्जापट्टी मिळावी, याबाबत गेल्या दोन वर्षांपासून प्लॉटधारकांकडून महसूल विभागाकडे रीतसर पाठपुरावा करण्यात येत आहे.
अनेक वर्षे रेंगाळत पडलेला हा विषय मार्गस्थ होणे गरजेचे आहे. याकामी लवकरच प्रांताधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यावेळी राजाराम सुतार, बाळासोा कळसकर, सुधाकर पलाने, तुकाराम सुतार, केरबा घुरे, पांडुरंग पाटील, ए. ए. शालबिद्रे, सिद्धार्थ कांबळे, बाळासोा पंडे, शिवाजी खतकर, शिवाजी कुंभार, धनाजी टेबुगडे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.