शुभम गायकवाड : उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात गावचावडी कार्यालय वगळता एकही शासकीय कार्यालय नाही. नगरपालिका व्हावी या मागणीसाठी जोर धरलेल्या उदगावसह परिसरातील गावांसाठी उदगाव येथे स्वतंत्र मंडल कार्यालय करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. उदगावलगत शहरी भाग असलेल्या जयसिंगपूर मंडल कार्यालयात जयसिंगपूर, उदगाव, संभाजीपूर, दानोळी, कोथळी, उमळवाड, जैनापूर, कवठेसार, चिंचवाड अशा नऊ गावांचा भार आहे. उदगावचे क्षेत्र हे १,७४६ हेक्टर इतके असून सध्या निमशहरी प्रवर्गात मोडते. गावात औद्योगिक वसाहतीसह नगरपालिका करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जयसिंगपूर कार्यालयावर असणारा ताण कमी करावयाचा झाल्यास उदगाव कार्यालय करणे सोयीचे होईल, असे मत ग्रामस्थांचे आहे.
येथील तलाठी कार्यालयात मंडल अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र विभाग अस्तित्वात आहे. परंतु मंडल कार्यालयासाठी असणारा आकृतिबंध हा वरिष्ठ पातळीवरून मंजूर करावा लागत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.
--------------
कोट - उदगाव हे मोठे गाव असूनही तिथे एकही शासकीय कार्यालय नाही. मंडल कार्यालय झाल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थांना याचा लाभ होईल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू.
स्वाती सासणे, समाजकल्याण सभापती
------------------
कोट - वरिष्ठ स्तरावरून सज्जा फोड करावी लागते. फोड झालेनंतर स्वतंत्र मंडल कार्यालय करता येते. तशी कार्यवाही झाल्यानंतरच जयसिंगपूर मंडल कार्यालयांतर्गत असणा-या नऊ गावांमध्ये पुनर्रचना करता येईल.
- संजय सुतार, मंडल अधिकारी जयसिंगपूर