कोल्हापूर : अॅट्रॉसिटी कायदा कोणालाही भीती दाखविण्यासाठी वा त्रास देण्यासाठी नसून, तो अनुसूचित जातिजमातीसाठी संरक्षण कवच आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा मराठा समाजातील नेत्यांनी जातीयवादी समाजमन सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला. कोपर्डी हे फक्त निमित्त असून अॅट्रॉसिटीविरोधात काढले जाणारे मोर्चे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी गुरुवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, माजी आमदार राजू आवळे, जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर, निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाणे उपस्थित होते. प्रा. कवाडे म्हणाले, कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाज उशिरा का होईना, रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत आहे. लाखोंचे मोर्चे निघत आहेत, ही अभिनंदनाची बाब आहे; परंतु कोपर्डीचे निमित्त करून अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, त्यात सुधारणा करावी, अशी मागणी म्हणजे ‘वड्याचं तेल वांग्यावर’ असला प्रकार सुरू आहे. असे मोर्चे यापूर्वीही विदर्भ, मराठवाड्यात निघाले आहेत. वरिष्ठ वर्गावर या कायद्यान्वये खोटे खटले दाखल केले जातात, या आरोपात फारसे तथ्य नाही.जे पक्ष, संघटना अॅट्रासिटी कायदा रद्द करावा वा त्यात सुधारणा करावी, अशी भूमिका घेतील त्यांच्यावर अनुसूचित जातिजमातींतील लोकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)अज्ञानातून टीकामनसेचे नेते राज ठाकरे, खासदार उदयनराजे वा अन्य नेते हे अज्ञानातून अॅट्रॉसिटी कायद्यावर टीका करीत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. मी त्यांची भेट घेऊन त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याबद्दलची योग्य माहिती सांगेन, असे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. पवारांनी तेव्हा का विरोध केला नाही ?अॅट्रॉसिटी कायदा लागू केल्यानंतरही दलितांवरील अत्याचार कमी झाले नाहीत, असे आढळून आल्यावर १९८९ साली संसदेने या कायद्यात सुधारणा करून अनेक कडक कलमांचा समावेश केला. त्यावेळी शरद पवार संसदेत असूनही त्यांनी विरोध का केला नाही? असा प्रश्न प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला.सनातन आतंकवाद्यांपेक्षा कमी नाही!डॉ. वीरेंद्र तावडे व समीर गायकवाड या सनातनच्या हस्तकांचा डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देऊन ‘सनातन’सारख्या आतंकवादी संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.तुम्ही राजे आहात!खासदार उदयनराजे यांनी अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल आमदार प्रा. कवाडे म्हणाले, उदयनराजे, तुम्ही राजे आहात! ज्या शिवरायांनी महार-मराठ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली, त्या शिवरायांचे वंशज आहेत. वंचित आणि उपेक्षित समाजाच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे.
‘अॅट्रॉसिटी’पेक्षा समाजमनात सुधारणा करा
By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST