कोल्हापूर : शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती. खुर्ची सांभाळण्यासाठी कोणाचे तरी ऐकणार असाल तर देव तुमचे कल्याण करो. शेतकऱ्यांच्या बाजूने राहा; अन्यथा मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो, पुढील वर्ष सरकारसाठी वाईट जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. एकरकमी ‘एफआरपी’साठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी खासदार शेट्टींच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट इशारा मोर्चा काढत साखर कारखानदारांसह सरकारला तंबी दिली. ‘कोण म्हणतो देत नाही...’, ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देत दसरा चौकातून सीपीआर रुग्णालय, भाऊसिंगजी रोड, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, फोर्ड कॉर्नरमार्गे शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली आणि येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी साखरेचे दर पडल्याने कारखानदारांना दया दाखवली; पण यावर्षी साखरेला २८०० रुपये दर आहे. ४० लाख टन साखर निर्यात होणार आहे. दुष्काळामुळे उसाबरोबर साखरेचे उत्पादनही कमी होणार असल्याने तीन हजारांच्या वर साखरेचे दर जातील. त्यामुळे एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास अडचण येणार नाही. तरीही कारखानदारांनी रडीचा डाव केला, तर त्यांच्या छाताडावर बसून ‘एफआरपी’ वसूल केल्याशिवाय राहणार नाही. साखर कारखान्यांच्या सभेत टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचे बेकायदेशीर ठराव केले आहेत. याची सुरुवात प्रकाश आवाडे यांनी केली आहे. हे ठराव त्यांना मागे घ्यावे लागणार असल्याने आवाडेंचे दात त्यांच्याच घशात जाणार आहेत. साखर सहसंचालकांना विनंती आहे, त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करून १४ दिवसांत ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देण्याचे आदेश द्यावेत. जे देणार नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ‘राजारामबापू’, ‘वारणा’, ‘संताजी घोरपडे’ या कारखान्यांनी गत हंगामातील पैसे दिलेले नाहीत. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे. हे पैसे मिळाले नाहीत, तर आज केवळ बळिराजाच्या फौजेने संचलन केले आहे. पुढच्यावेळी तुमच्यावर आक्रमण करून कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्यास मंत्री समितीने परवानगी दिल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीची मंडळी सांगत आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली; पण आपण तसे कोणालाही सांगितले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ६ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत निर्णायक लढाईचे रणशिंग फुंकले जाणार आहे. तत्पूर्वी, १९ आॅक्टोबरला श्रीरामपूर येथे मोर्चा आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयावर इशारा मोर्चा काढणार आहे. ऊस परिषदेपर्यंत सरकारने कोणाच्या बाजूने राहायचे ते ठरवावे. कारखानदारांच्या बाजूने राहिलात तर आम्हाला सरकारविरोधात बंड करावे लागेल, असा इशारा देत गावागावांतील शेतकऱ्यांच्या एकरकमी ‘एफआरपी’बाबतच्या सह्यांचे अर्ज घेऊन प्रसंगी न्यायालयात जाऊ, असेही शेट्टी यांनी सांगितले. आपल्या खास शैलीत साखर कारखानदारांसह सरकारवर आसूड ओढताना ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, राजू शेट्टी बाहेर का पडत नाहीत, असा अनेकांना प्रश्न पडला होता. कधी पण बाहेर पडायचे नसते. घात बघूनच मैदानात यायचे असते. सत्तेसाठी आम्ही कधीच लाचार झालेलो नाही. ज्यांनी १५ वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवल्या, अशा जयंत पाटील यांनी आम्हाला बाहेर पडण्याचा सल्ला देऊ नये. आमचा आमदारच नाही, त्यामुळे आम्ही बाहेर काय आणि आत काय? देवेंद्र फडणवीस यांना ऊस व दुधातील कळत नाही म्हणून त्यांना सल्ला देण्यासाठी काही मंडळी आत घुसू पाहत आहेत. शिवसेना कधी बाहेर पडते आणि आत कधी जायाला मिळते, याच नादात राष्ट्रवादीची मंडळी असल्याची टीका खोत यांनी केली. आमचे सरकार आले म्हटल्यावर आम्हाला बरे वाटले; पण आमचा कबड्डीचा डाव सुरू आहे, असे सांगत २००४ पासून ६४५ रुपयांवरून २३०० ‘एफआरपी’ केवळ राजू शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळेच शेतकऱ्यांच्या पदरात पडली. या ‘एफआरपी’चे आता तुकडे करण्यास कारखानदार निघाले आहेत. परंतु, कायदा आमच्या बाजूने आहे. ‘एफआरपी’चे तुकडे पाडणाऱ्यांच्या हातात सरकारने बेड्या ठोकाव्यात. व्यापाऱ्यांना हाताशी धरून साखरेचे दर पाडण्याचे षड्यंत्र कारखानदारांनी केले. सहकारमंत्र्यांनी हिंमत दाखवून याची चौकशी केली तर हे पैसे कारखानदारांच्या घरी सापडतील. सरकार आपले असले तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका. दसऱ्यासाठी काढणारी हत्यारे पाजवून तयार ठेवा, असा इशाराही खोत यांनी दिला. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर, सतीश काकडे, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी एकरकमी ‘एफआरपी’ मिळावी, या मागणीचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ६९,२६८ शेतकऱ्यांचे अर्ज प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पृथ्वीराज जाचक, माजी आमदार नानासाहेब माने, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, अनिल मादनाईक, जयकुमार कोल्हे, आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना विसराल, तर पुढचे वर्ष वाईट
By admin | Updated: October 17, 2015 00:52 IST