कोल्हापूर : महाराष्ट्रात बहुजनवादी जाणीवेचा इतिहास आणि ललित लेखनातून तो मांडण्याचा प्रयत्न केला. जागतिकीकरणाच्या सध्याच्या स्थितीत बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनातील ‘कथासंधी’ कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्य अकादमी आणि विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.ज्येष्ठ साहित्यिक पवार म्हणाले, पहिला नाटक लिहिण्यास सुरुवात केली. यावेळी लेखन करताना केवळ व्यक्तिवाद, केवळ समग्रवादी तत्त्व आवश्यक असून तरच, बहुजनांबद्दल लिहिता येते हे लक्षात आले. हे तत्त्व बाळगून लेखन सुरू केले. मुंबईसारख्या महानगरांतील जडणघडण आणि जागतिकीकरणाच्या काळातील उपेक्षित माणसांच्या विश्वाने मला सतत लेखननिर्मितीसाठी विषय पुरविले. जागतिकीकरणामुळे पूर्वसमाजात तुटलेपण आले आहे. त्यात बहुजन समाजाची उपेक्षा होत आहे. ती समजून घेण्याची गरज आहे.कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी साहित्य अकादमीची भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक पवार यांच्या लेखनाचे विवेचन केले.यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. शरद नावरे आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. रुपाली कांबळे यांनी आभार मानले. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक पवारलिखित ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या कथेचे अभिवाचन अतुल पेठे यांनी सादर केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पवार यांनी ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकांच्या निर्मितीबाबत उपस्थितांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा
By admin | Updated: August 30, 2015 23:09 IST