कोल्हापूर : आमची सून आमच्या ताब्यात द्या, नांदवायला तयार आहे, अशी याचना तीन प्रकरणांतील सासू, सासरे, पती यांनी सुनावणीवेळी केली. सर्वसाधारणपणे सुनेला नांदवायला सासरची मंडळी तयार नसतात. मात्र, या तीन प्रकरणांत सूनच सासरी जायला तयार नाही, असे वेगळे चित्र दिसून आले, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. रहाटकर सोमवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्'ांतील महिला समुपदेशकांच्या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी दुसऱ्या दिवशी येथील मंगळवार पेठेतील बालसंकुलात तक्रारींची सुनावणी घेतली. त्यानंतर रहाटकर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. रहाटकर म्हणाल्या, न्यायालयात दाखल न झालेल्या आणि थेट आयोगाकडे आलेल्या ५९ तक्रारींची सुनावणी घेण्यात आली. सुनावणीत वैवाहिक, कौटुंबीक, कार्यालयात लैंगिक छळ, मालमत्ताविषयक अशा तक्रारींचे स्वरूप होते. त्यामध्ये दोन्ही बाजूंकडील लोक उपस्थित असलेल्या ठिकाणी त्वरित तोडगा काढण्यात आला. तडजोडीने मिटवणे हे आयोगाचे पहिले काम आहे. त्यासाठी प्रयत्न केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. पती सोबत राहत नाही, दारू पिऊन मारहाण करतो, घरी पैसे देत नाही, मुलांचा सांभाळ करत नाही, अशा कौटुंबीक तक्रारी होत्या. वडिलांच्या मालमत्तेत वारस म्हणून मुलीचे नाव लागले आहे; परंतु संबंधित मालमत्ता ताब्यात दिली जात नाही, अशा तक्रारी होत्या. महिला अत्याचाराची वर्गवारी करणे, पीडित महिलेस केंद्रस्थानी ठेऊन त्वरित न्याय मिळवून देणे, अन्यायग्रस्त महिलेस सहज न्याय मिळण्याची व्यवस्था करणे, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ यामध्येही लैंगिक अत्याचार प्रतिबंध समितीचे काम प्रभावी व्हावे यासाठी प्रयत्न करणे अशी कामे आयोग पुढील काळात करणार आहे.सातजणांचे संसार जुळले..विविध कारणांनी अनेक वर्षांपासून विभक्त असलेल्या पती, पत्नींना सुनावणीत एकत्र आणून ७ जणांचे संसार जुळविण्यात आयोगास यश आले. तुटलेल्या संसार जुळविलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील मुलगी आणि पन्हाळा तालुक्यातील मुलाने प्रातिनिधीक स्वरूपात एकत्र कसे आलो, याची माहिती पत्रकारांना दिली. ‘पतीला राग आला की पत्नीने शांत राहायचे आणि पत्नीला राग आला की पतीने शांत राहायचे’ हे समुपदेशनात सांगितलेले तंत्र यापुढील काळात अंमलात आणत आनंदाने संसार करणार असल्याचे दोघांनी सांगितले.सर्वाधिक तक्रारी कोल्हापूर जिल्ह्यातील....जिल्हा निहाय सुनावणी झालेल्या तक्रारींची संख्या अशी : कोल्हापूर - ४७, सांगली - ७, सातारा - ३, सिंधुदुर्ग - २, रत्नागिरी व सोलापूर - ०.पाय धरून नमस्कारविवाहानंतर एकमेकांपासून अनेक दिवस दूर राहिलेल्या पती, पत्नींना एकत्र आणून संसार जोडलेली काही जोडपी आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांचे पाय धरत नमस्कार केला. त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याचा मोहही संबंधित जोडप्यांना आवरता आला नाही.
आम्हाला आमची सून मिळवून द्या
By admin | Updated: May 11, 2016 00:56 IST