चंदगड : ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) वरील रहिवाशांना त्यांच्या जमिनी तत्काळ परत कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकवडे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, पारगडवर इ. स. १६७६ पासून येथील रहिवासी राहत आहेत. मात्र, या गडावरील जमिनीच्या ७/१२ वर वनविभागाची नोंद झाली आहे. या गडावर ३५० वर्षांपासून शेलार, मालुसरे, गडकरी, माळवे, आडाव, नांगरे, तांबे, डांगे, जांभळे, कुबल, शिंदे, झेंडे यांसह १२ बलुतेदारांची ५५ घरे आजही वास्तव्यास आहेत. या कुटुंबांच्या ७/१२ उताऱ्यावर वनविभागाची नोंद झाली आहे. त्यामुळे घरे असूनही पारगडवासीय बेघर झाले आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी पारगडचे संरक्षण केले त्यांची नावे सात-बारा उताऱ्यावर लावण्याचा प्रस्ताव वनविभागाने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर, तालुकाप्रमुख संजय पाटील, महादेव गावडे, शरद पाटील, विजय चौगुले, नीलेश देवणे, प्रसाद पिलारे, गणेश जोग, सतीश कांबळे, परशराम डवरी, आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
पारगडवासीयांना तत्काळ जमिनी द्या
By admin | Updated: December 19, 2014 23:31 IST