चंद्रकांत पाटील - गगनबावडागावात प्रवेश करताना आत नाक धरून जावे लागत आहे. निर्मल ग्राम बक्षिसांच्या खर्चाचा हिशेबही लागेना, अशी स्थिती गगनबावडा तालुक्याची झाली आहे. एकूणच बक्षीस मिळेपर्यंत सर्वत्र स्वच्छता होती. त्यानंतर सर्वत्र घाणच घाण, अशी काहीशी निर्मल ग्रामची अवस्था झाली आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्याबरोबर गगनबावडा तालुक्यात मोठा गाजावाजा करीत राबविण्यात आला. संपूर्ण निर्मल ग्राम होण्याचा राज्यातील पहिला मान पन्हाळा तालुक्यापाठोपाठ गगनबावडा तालुक्याला मिळाला. त्याचे सर्वत्र कौतुकही झाले; पण वस्तुस्थिती वेगळी होती. हा कार्यक्रम जनतेच्या सहभागातून राबवून गावे हागणदारीमुक्त करावयाची होती; पण त्यासाठी जनतेच्या मताचा विचार झालाच नाही, तर पोलीस खात्याने लोकांना पहाटे घराबाहेर पडणेही अशक्य केले. शौचालये बांधण्यासाठी सक्ती करण्याचे प्रकार घडले. शौचालये बांधली नाहीत म्हणून अनेक गोरगरिबांचे रेशनचे धान्य बंद करण्यात आले. एवढे करूनही शौचालये बांधणे अशक्य असलेल्या गोरगरिबांना तात्पुरती शौचालये उभारण्यास भाग पाडले. निर्मल ग्राम तपासणीसाठी येणार म्हटल्यावर शाळेतील मुलांना रस्ते चकाचक करण्याची सक्ती केली. गटारे स्वच्छ करावी लागली. महिलांनी रांगोळी घालून समितीचे स्वागत केले. समिती या स्वागताने भारावून गेली. निर्मल ग्रामचे चांगले काम झाले असले, तरी अनेक गावांत कागदोपत्री सर्व शौचालये झाल्याची नोंद झाली; पण आज अनेक गावांची स्थिती पाहिल्यास ही गावे निर्मल ग्राम आहेत. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, अशी स्थिती आहे.तात्पुरती शौचालये बंद झाली आणि लोक आजही पुन्हा रस्त्यावर घाण करीत आहेत. गावागावांत पूर्वीसारखेच साथीचे रोग थैमान घालू लागले आहेत. निर्मल ग्रामचे बक्षीस घेतले; पण गावातील ही अस्वच्छता पाहिली, तर हा निधी गेला कुठे, अशीही उघड चर्चा होत आहे.योजना कागदोपत्रीच...
गगनबावडा तालुक्यात निर्मल ग्रामचा बोजवारा
By admin | Updated: August 20, 2015 23:20 IST