इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित चालू करावी, या मागणीसाठी १३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्या मेळाव्यात केली. तसेच आठवडाभरात सायझिंग-वार्पिंग कामगार बेमुदत संपावर जातील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाच्या फेररचनासाठी लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा राज्य शासनाने २९ जानेवारी २०१५ रोजी किमान वेतनाच्या फेररचनेची अधिसूचना जारी केली. फेररचनेची अंमलबजावणी सुरू करावी यासाठीसुद्धा राज्यातील विविध संघटना आंदोलने करीत आहेत. त्यासाठी भिवंडी, सोलापूर व इचलकरंजी याठिकाणी कामगार परिषदा झाल्या. सर्वांची राज्यव्यापी कृती संघटना माजी आमदार नरसय्या आडाम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित झाली. २० मे रोजी मुंबई येथील मोर्चा काढला. यावेळी माजी आमदार आडाम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाबरोबर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोनवेळा नियोजित बैठका शासनाकडून रद्द झाल्या. शासनाच्या अशा प्रकारच्या चाल-ढकल धोरणाच्या विरोधात सोमवारी येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेचा मेळावा झाला. मेळाव्यामध्ये कामगार नेते ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, दशरथ जाधव, मनोहर ढवळे, हणमंत मुत्तूर, सूर्यकांत शेंडे, मारुती जाधव, चंद्रकांत गागरे व शिवलाल कोलप यांची भाषणे झाली. इचलकरंजी येथून पुन्हा लढा उभारण्यासाठी १३ जुलैला इचलकरंजीतील शाहू पुतळ्यापासून मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. त्याचबरोबर आठवड्याभरात ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा मेळाव्यामध्ये देण्यात आला. (प्रतिनिधी)
यंत्रमाग कामगारांचा सोमवारी मोर्चा
By admin | Updated: July 7, 2015 01:36 IST