या पत्रामध्ये समाजातर्फे आरक्षण संसदेतही मंजूर करून घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे. यासोबतच समाजाला सक्षम करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकमत करून प्रयत्न करावेत, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी राज्यशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी आपली लेखी भूमिका स्पष्ट करावी. यासह अन्य मागण्यांबाबतचे पत्र सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविण्यात आले. याच्या प्रति उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते व मंत्री अशोकराव चव्हाण यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या पत्रावर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, शशिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
मागण्या अशा
- समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यासाठी राज्य विधिमंडळात आरक्षणाचा ठराव करून तो केंद्राला पाठवावा. तेथे हा ठराव संसदेत मंजूर करून घेण्यास भाग पाडावे. राष्ट्रपतींच्या सहीने समाजाला घटनात्मक आरक्षण मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी.
-आरक्षण मिळेपर्यंत समाजाला राजर्षी शाहू महाराज शिक्षण, प्रशिक्षण, मानव विकास संस्था(सारथी) व कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची भरीव तरतूद करून संस्था सक्षम कराव्यात. त्यांचा विस्तार करावा. या संस्थांची उपकेंद्र राज्यभरात व्हावीत. या संस्थेवर मराठा समाजातील तज्ज्ञांचा समावेश करावा. सारथीसाठी २००० कोटींचा निधी द्यावा. कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करा.
- अण्णासाहेब पाटील अर्थिक महामंडळात शैक्षणिक कर्जाचा समावेश करावा. कर्ज वितरणात सुलभता आणावी. कर्जाची मर्यादा वाढवावी. या महामंडळासाठी ५००० कोटीपर्यंत तरतूद करावी.
-राज्य शासनाने केंद्राला घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण देण्यासाठी संसदेत तसा ठराव करण्यासाठी घटना दुरुस्तीकरिता भाग पाडावे.
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीकरिता ओबीसीप्रमाणे शैक्षणिक शुल्क रचना करावी.
- सरकारी नोकरीत मराठा आरक्षणातून ज्यांची निवड झाली आहे, त्यांना तत्काळ नोकरीवर रुजू करून घ्यावे.
- ओबीसीप्रमाणे मराठा समाजालाही नाेकरी व शिक्षणांमध्ये सुविधा द्या.
- कोरोनावर मात करण्यासाठी पक्षीय राजकारण थांबवावे.
-बाजारमूल्यांवर आधारित हमीभाव लागू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार राज्य शासनाने भारतात परत आणावी.
- छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक म्हणजे गडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.