गडहिंग्लज :
गडहिंग्लज तालुक्यात गुरुवारी (२२) दिवसभरात सरासरी २२४ मिलीमीटर इतका
विक्रमी पाऊस झाला. हिरण्यकेशीच्या महापुरामुळे गडहिंग्लज शहरासह
तालुक्यातील २० गावांना तडाखा बसला आहे.
एकूण ५६९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ५७६ लहान मुले, १०१४ पुरुष व १०४५ महिला मिळून २६३५ नागरिक आणि १७४१ जनावरांना सुरक्षितस्थळी
हलविण्यात आले आहे.
सर्वाधिक दुंडगे येथे ११२ तर जरळी येथील १०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
गावनिहाय स्थलांतरित कुटुंबांची संख्या कंसात अशी : गडहिंग्लज शहर (२४),
भडगाव (८३), गिजवणे (५), नांगनूर (११), अरळगुंडी (५२), कडलगे (९), खणदाळ (२१), नूल (२४), हिटणी (२४), जरळी (१०), मुगळी (४), हेब्बाळ (३८),
दुंडगे (११२), निलजी (७), ऐनापूर (११), इंचनाळ १४), बेळगुंदी (३),
महागाव (५), हरळी बुद्रुक (४), हरळी खुर्द (२) गडहिंग्लज विभागाचा संपर्क तुटला.
भडगाव व गजरगाव पुलावर पाणी आल्यामुळे आणि ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया
पुलावरून वाहतुकीला बंदी घातल्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीनही
तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चौकट
आंबेओहळ प्रकल्प भरला
उत्तूर : २२ वर्षे प्रतीक्षेत असलेल्या आंबेओहळ प्रकल्पात यावर्षीपासून
पाणी साठविण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्याच वर्षी प्रकल्प पूर्ण
क्षमतेने भरला असून सांडव्यावरून ३७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
आहे. चिकोत्रा प्रकल्पही पूर्ण भरला असून त्यातून ८०० क्युसेक पाण्याचा
विसर्ग सुरू आहे.
चौकट : संकेश्वरात १५० कुटुंबांचे स्थलांतर
संकेश्वर : संकेश्वर येथील नदीगल्ली, मठ गल्ली व जनता प्लॉट या परिसरातील १५० कुटुंबांतील २०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले
आहे. शंकराचार्य मठात ८ फूट पाणी असून लक्ष्मी मंदिर परिसरातील वसाहतीलाही पुराच्या पाण्याने वेढले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली.
पुणे-बेंगलोर रोडवर पाणी आल्याने वाहतूक बंद बसून ही किरकोळ वाहतूक
जुन्या पी. बी. रोडवरून सुरू आहे.