राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर राज्य सरकारने शेतकऱ्यांना अडतीच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण जाणीवपूर्वक खरेदी दर पाडण्याचे प्रकार सुरू असल्याने अजूनही शेतकरी अडकित्त्यातच आहे. जून महिन्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक जास्त असल्याने दरात घसरण झाल्याचे म्हटले तरीही तुलनात्मक दर प्रतिक्विंटल ५२३ रुपयांनी कमी झाल्याने ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा या नाशवंत मालासाठी ६ टक्के अडत शेतकऱ्यांकडून वसूल केली जात होती; पण अडतच्या जोखडातून शेतकऱ्यांची मान सोडविण्यासाठी ५ जुलैपासून राज्य सरकारने अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्याचा फतवा काढला. त्याला खरेदीदारांनी कडाडून विरोध केला, पण सरकार व बाजार समित्याही ठाम राहिल्याने सध्या अडत खरेदीदारांकडूनच वसुली सुरू आहे. अडतचे पैसे दरातून काढण्याचा प्रकार विशेषत: भाजीपाला मार्केटमध्ये अधिक सुरू आहे. अडतचे पैसे गृहीत धरूनच खरेदीदार सौद्यात बोली लावत असल्याने जून ते आॅगस्ट या महिन्यातील भाज्यांचे दर तुलनात्मक पाहिले तर फरक दिसतो. कोल्हापूर बाजार समितीत जून महिन्यात ६८ हजार २६१ क्विंटल फळे-भाजीपाल्याची आवक झाली आहे. या महिन्यात सरासरी प्रतिक्विंटल १९५१ रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. जुलैमध्ये अडत घेण्यास सुरुवात केल्याने खरेदीदारांनी संप केला, त्यात जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटलीच पण फळ मार्केट ओस पडले होते. परिणामी दोन्हींची आवक ४८ हजार ७२ क्विंटल झाली. या महिन्यातील सरासरी दर १७०३ रुपये राहिला. शेतकऱ्यांकडून अडत वसूल करणे हे चुकीचे आहेच, पण हमीभावासाठी सरकार काय करणार हे महत्त्वाचे आहे. पूर्वी ६ टक्क्यांप्रमाणे भाजीपाल्यासाठी प्रतिकिलो २.४० रुपये अडत बसते, पण सध्याचा भाजीपाल्याचा दर पाहता प्रतिकिलो ५.२३ रुपये दर कमी झाला आहे. त्यामुळे शेवटी नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागत आहे. केवळ ७४८ क्विंटल आवकेत वाढ आॅगस्टमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचा कांगावा सुरू असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. जूनच्या तुलनेत आॅगस्टमध्ये दिवसाला सरासरी ७४८ क्विंटल भाजीपाला वाढला आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ही आवक योग्यच होती. त्यामुळे प्रतिक्विंटल सव्वापाचशे रुपये दरात घसरण होणे रास्त आहे काय? असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे. अडते नरमले! पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत मिळत होती, त्यावेळी अडते जादा दरासाठी चढाओढ करायचे. आता खरेदीदारांकडूनच अडत मिळणार असल्याने त्यांना दुखाविण्याच्या मानसिकतेत अडते नाहीत. भाजीपाला हा कच्चा माल आहे असल्याने त्याला नियमन मुक्त करणे चुकीचे ठरणार आहे. नियमनात घेतले तरच स्पर्धा होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे अधिक जाऊ शकतात. - विश्वास पाटील, सदस्य, महालक्ष्मी भाजीपाला असोसिएशन तीन महिन्यांत तुलनात्मक दरदाम महिना फळे/भाजीपाला प्रतिक्विंटल आवक क्ंिवटलमध्ये दर रुपयांत जून ६८ हजार २६१ १९५१ जूलै ४८ हजार ७२ १७०३ आॅगस्ट ७१ हजार ८९७ १४२८ ‘भाऊ’ दराकडे लक्ष देणार का? पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना अडत मुक्त केले, पण गेले दोन महिने कोसळणाऱ्या दराकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आवक वाढल्याच्या नावाखाली भाजीपाला कवडीमोल दराने शेतकऱ्यांना विकावा लागत आहे.
अडत जाऊनही शेतकरी अडकित्त्यातच!
By admin | Updated: September 5, 2016 00:24 IST