लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवसांपासून रोज वळीवाच्या पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिपक्व झालेले सूर्यफूल व भुईमुगाची काढणी खोळंबली आहे. हा पाऊस उसाला पोषक असला तरी भाजीपाल्यासह इतर पिकांना मारक ठरत आहे.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल काढणीस आले आहे. या पिकांची वेळेत काढणी झाली तर ते वाळवून ठेवणे अधिक सोपे जाते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज वळीव पाऊस हजेरी लावत आहे. पडेल तिथे पडेल असा पाऊस असला तरी जिथे पडेल तिथे पाणी पाणी करत आहे. त्यामुळे शिवारात पाणीच पाणी तुंबले आहे. हाताताेंडाला आलेली पिके काढायची कशी? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोथंबीर, मेथी, पोकळा यासह फळभाज्यांचे पावसाने मोठे नुकसान केले आहे. पाऊस त्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीट व्यावसायिकांचे तर पावसाने कंबरडे मोडले आहे.
दरम्यान, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तापमानात घट झाली असून किमान २४ तर कमाल ३५ डिग्रीपर्यंत राहिले आहे. आज, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.
असे राहील तापमान, डिग्रीमध्ये-
वार किमान कमाल वातावरण
सोमवार २५ ३४ ढगाळ, पाऊस
मंगळवार २३ ३४ ढगाळ नंतर स्वच्छ
बुधवार २२ ३६ स्वच्छ
गुरुवार २२ ३५ स्वच्छ