लोकमत न्यूज नेटवर्क
सरूड :
विश्वासराव नाईक साखर कारखान्यात
उसाच्या रसापासून प्रतिदिन १ लाख लिटर इथेनॉल तयार करणारा प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरूडकर हे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
आमदार नाईक पुढे म्हणाले, येत्या गळीत हंगामात पूरपट्ट्यातील ऊस प्राधान्याने उचलण्यासाठी कारखान्याच्या वतीने विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. भविष्यात पुराच्या पाण्याने कमी हानी होणारे ऊस बियाणे विकसित करण्याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला विनंती करण्यात आली आहे. पुढील गळीत हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येणार असून कारखाना प्रतिदिन ६ हजार मे. टन क्षमतेने गाळप करेल.
केंद्र सरकार दरवर्षी उसाची किंमत वाढवत आहे, त्याबरोबर साखरेच्याही किमती वाढवणे गरजेचे आहे. सर्जेरावदादा नाईक बँकेत ज्या शेतकऱ्यांचे, वाहतूकदार व ठेवीदारांचे पैसे आहेत ते निश्चित परत मिळतील. यासाठी खातेदारांनी पैसे मागणीसाठी बँकेकडे अर्ज करावेत.
सभेस अमरसिंह नाईक, विराज नाईक, सुनीतादेवी नाईक, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, अश्विनीताई नाईक, आदींसह सर्व संचालक व मोजके सभासद, खातेप्रमुख उपस्थित होते.
फोटो ओळी :
चिखली येथे विश्वासराव नाईक सह. साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सभेत आमदार मानसिंगराव नाईक यांनी संबोधित केले. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरूडकर, मान्यवर उपस्थित होते.