जहाँगीर शेख --कागल कागलनगर, सांगाव आणि गेली १४ वर्षे मागासवर्गीय गृहनिर्माण तसेच आजी-माजी सैनिक गृहनिर्माण सोसायटीसाठी प्रस्तावित असणारा अंदाजे नऊ एकरांतील भूखंड शासनाने ‘म्हाडा’साठी वर्ग केल्याने अनेकांच्या घरकुलाच्या आशेवर पाणी पडले आहे. दरम्यान, या प्रस्तावित गृहनिर्माण सोसायट्या शासनाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीला लागल्या आहेत. तसेच रस्त्यावरचीही लढाई छेडण्याचा इशारा दिला आहे.कागल - कसबा सांगाव रस्त्याकडेला आणि गहिनीनाथ नगरसमोर ऐन मोक्यावर सर्व्हे नं. ४२५ हा मोठा भूखंड आहे. ३.६२ घरकुले हेक्टर इतके हे क्षेत्र आहे. या ठिकाणी मागासवर्गीयांच्यासाठी घरकुले उभारणी करण्यासाठी सिद्धार्थ हौसिंग सोसायटी आणि राजर्षी शाहू हौसिंग सोसायटी यांनी नगराध्यक्षांकडून ना हरकत परवाना घेऊन शासनाकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. त्याचबरोबर आजी-माजी सैनिकांनीही घरकुलांसाठी जागा मागणी केली आहे. गेली १५ वर्षे मंजुरीसाठी कागदोपत्री व्यवहार सुरू आहेत. जवळपास सहाशे सभासद या ठिकाणच्या घरकुलांवर आस लावून बसलेले आहेत.कागदपत्रे पूर्तता, मंजुरी, संस्था निर्मितीसाठी मोठा खर्चही करण्यात आला आहे, तर कागल नगरपालिकेनेही याच ठिकाणी दसरा मैदान, प्राथमिक शाळा, क्रीडांगण असे आरक्षण पालिका सभेत टाकले आहे. एकीकडे या भूखंडाच्या प्राप्तीसाठी अशी रस्सीखेच सुरू असताना आता महाराष्ट्र शासनाने ही जागा ‘म्हाडा’कडे वर्ग करण्याचे आदेश देऊन सात-बारावर तशी नोंद केल्याने शासनाच्या या एका आदेशाने अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. या जागेवर ‘म्हाडा’तर्फे गृहनिर्माण योजना उभी करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध या प्रस्तावित गृहनिर्माण संस्था न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई लढणार आहेत. तशी तयारी सुरू केली आहे.कागलमध्ये म्हाडाचे आगमन...गट क्र. ४५२/२ पैकी ३.६२ आर हेक्टर इतक्या जागेवर म्हाडाचे नाव लावण्यात आले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधीकरण, पुणे (म्हाडा) यांच्यावतीने येथे सदनिका उभारण्यात येईल. हे कामही येत्या महिन्याभरात सुरू होणार असल्याचे समजते. कागलमध्ये पहिल्यांदाच म्हाडाचे आगमन झाले आहे. मात्र, प्रस्ताव वर्षापूर्वीच शासनविचाराधीन झाल्याचे समजते.मोक्याची जागागेल्या दहा वर्षांत कागल शहराचा मोठा विस्तार झाला आहे. चोहोबाजूंनी शहर जागा दिसेल तिकडे पसरले आहे. आता म्हाडाने आरक्षित केलेल्या जागेभोवती अनेक नगरांची उभारणी झाली आहे. या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे येथे गेली १५ वर्षे हे गृहनिर्माणचे प्रस्ताव लटकलेले आहेत. ‘तू की मी’ यातूनही एकमेकांवर कुरघोडी केली गेली असतानाच आता हा भूखंड या सर्वांच्या हातून निसटला आहे. त्यामुळे ही खळबळ उडाली आहे.
आठ अज्ञातांचा युवकावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: January 22, 2017 00:34 IST