गांधीनगर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचा फटका गांधीनगर, उचगाव व वळीवडे येथील व्यापाऱ्यांना बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तावडे हॉटेल चौक, गांधीनगर मुख्य रस्त्यावरील जवळपास शंभरावर दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य खराब झाले आहे. यात व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापारी चिंतातुर बनला आहे.
गेल्या साडे तीन महिन्यापासून कोरोना महामारीचे संकट आता कोठेतरी कमी होऊन व्यापार सुरु होतो न होतो तोवर महापुराचे संकट आ वासून उभे राहिल्याने येथील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तावडे हॉटेल परिसरात हॉटेल व्यावसायिक, कन्फेक्शनरी, ड्रायफूट, फर्निचर, लाईट हाऊस, गॅस स्पेअर पार्ट, भांडी दुकाने, अशी दुकाने अक्षरश: आठ ते दहा फूट पाण्याखाली होती. गणेश टॉकीजजवळ मुख्य रस्त्यावर असणारी रेडिमेड कापड दुकाने, तसेच आर्ट गॅलरी, साड्यांच्या दुकानात ओढ्याचे पाणी शिरल्याने दुकानातील साहित्यांची नासाडी झाली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे तावडे हॉटेल चौकात दहा फूट पाण्याची पातळी होती. त्यामुळे कोल्हापूर -गांधीनगर हा मार्ग पूर्णत: तीन दिवस बंद होता. वळीवडे हद्दीतील कुटिया मंदिर परिसर अद्याप पाण्याने वेढला आहे. नागरिकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्याने पूरग्रस्त भागातील दुकानदारांची मंगळवारी स्वच्छतेची लगबग सुरू होती. त्यामुळे विस्कटलेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
चौकट -पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्याने दुकानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ते साफ करण्यासाठी व्यावसायिक युद्ध पातळीवर कार्यरत झाले आहेत. पुराचा विळखा असलेल्या भागात पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा कुजू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याअगोदरच संबंधित ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
फोटो : २९ गांधीनगर नुकसान
तावडे हॉटेल परिसरातील व्यावसायिक पूर ओसरल्यानंतर दुकानाची स्वच्छता करण्यात व्यस्त होते.