कोल्हापूर : एलबीटी आणि जकातीला आमचा विरोध कायम आहे. व्हॅटमध्ये एक टक्का वाढ करा. मात्र, त्याऐवजी आम्हाला अन्य कोणताही पर्याय नको. जबरदस्तीने असा कोणताही पर्याय लादण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला ताकदीने विरोध करण्याचा निर्धार तसेच अधिवेशन संपेपर्यंत एलबीटी हटविण्याबाबत निर्णय न झाल्यास आणखी तीन महिने वाट पाहून नव्या सरकारशी याबाबत चर्चा करू, असा इशारा आज, मंगळवारी कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी दिला.एलबीटीबाबत गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघातर्फे येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर यांनी मुंबईतील एलबीटीबाबतच्या सुरू असणाऱ्या घडामोडींची उपस्थितांना माहिती दिली. एलबीटी आणि जकातीला आमचा विरोध कायम आहे. व्हॅटमध्ये एक टक्का वाढ करा. मात्र, त्याऐवजी आम्हाला अन्य कोणताही पर्याय नको. फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्राच्या (फॅम) नेतृत्वाखाली लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.कापडिया यांनी आपण तीन महिने आणखी वाट पाहू, असे आवाहन व्यापाऱ्यांना केले. बुरसे यांनी जकातीनंतर सरकारने आम्हाला व्हॅटचा पर्याय दिला. त्यानंतरही आमची फसवणूकच झाली आहे. जकात कालबाह्ण झालेली आहे. जकात आणि एलबीटीला विरोध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.या बैठकीत अधिवेशन संपेपर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास आणखीन तीन महिने वाट पाहून नव्या सरकारशी आमच्या प्रश्नांबाबत चर्चा करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. यावेळी संजय रामचंदाणी, प्रदीपभाई कापडिया, सुरेश पतोडी, श्रीनिवास मिठारी, श्रेणिक बिंदगे, संजय शहा, विवेक शेटे, सुधीर आपटे, सचिन शहा, अमोल नष्टे, मधुकर हरेल, हरिभाई पटेल, प्रवीणभाई शहा, आदी उपस्थित होते. अमर क्षीरसागर यांनी स्वागत केले. रवींद्र तेंडुलकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)