ठरवाठरवी अन् जमवाजमवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:40 PM2019-04-15T23:40:19+5:302019-04-15T23:40:28+5:30

चंद्रकांत कित्तुरे आ मचं ठरलयं, आपलं ठरलंय, आम्हीबी ठरीवलंय, जनतेनं ठरवलंय... अशा वाक्यांची सध्या रेलचेल आहे. ज्याच्या त्याच्या तोंडात ...

 Decree and mobilization | ठरवाठरवी अन् जमवाजमवी

ठरवाठरवी अन् जमवाजमवी

Next

चंद्रकांत कित्तुरे
आ मचं ठरलयं, आपलं ठरलंय, आम्हीबी ठरीवलंय, जनतेनं ठरवलंय... अशा वाक्यांची सध्या रेलचेल आहे. ज्याच्या त्याच्या तोंडात सहज बोलता बोलता ठरवाठरवीचीच भाषा असल्याचे दिसते. या ठरवाठरवीला इतके महत्त्व का यावे? तर त्याला कारण ठरलं आहे ते लोकसभा निवडणुकीचं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक आणि विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षातून ठरवण्याची भाषा ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. येवढेच काय, सतेज पाटील यांचा वाढदिवस तर ‘आम्ही ठरवलंय, आमचं ठरलंय’ हे सांगण्यासाठीच साजरा केला गेला की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती होती. कारण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती, फ्लेक्स, होर्डिंग्ज, व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशही आम्ही तुमच्यासोबत आहोत, आमच ठरलंय हे सांगणारेच होते. अगदी जाणता राजा शरद पवारांनाही त्याची दखल घ्यावी लागली. ‘तुमचं ठरलंय तर आम्हीबी ध्यानात ठेवलंय’ हे त्यांचे बोल बरेच काही सांगून जातात. ते काय ध्यानात ठेवतात आणि कोणता डाव कसा टाकतात हे येणारा काळच सांगेल. कॉँगेस-राष्टÑवादी आघाडीनेही ‘आमचं ठरलंय’ला उत्तर देण्यासाठी ‘जनतेनं ठरवलंय’ असं घोषवाक्य तयार केलं आहे. त्याचा प्रचार आणि प्र्रसार मतदारांपर्यंत करण्यासाठी झाडून सारी यंत्रणा कामाला लागली आहे. कुणी काहीही ठरवलं असलं तरी मतदारांनी काय ठरवलंय याच उत्तर पाहण्यासाठी आपल्याला २३ मे पर्यंत थांबावं लागणार आहे हे मात्र खरं!
कोणतीही निवडणूक म्हटले की जय, पराजय असतोच. या निवडणुकीसाठीची तयारी करण्यासाठी इच्छुक उमेदवार खूप आधीपासून कामाला लागलेले असतात. प्रथम आपली उमेदवारी कशी पक्की होईल हे पाहण्यासाठी नेत्यांची मनधरणी, कार्यकर्त्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणे, आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, निवडून येऊ शकतो हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करीत असतात. त्यात जो बाजी मारेल, त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते. त्यानंतर सुरू होते ती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची, कार्यकर्त्यांची, पैशाची जमवाजमव. त्यानंतर सुरू होतो तो प्रचाराचा धुमधडाका. बरं निवडून येणंही सोपं नसतं. विरोधी उमेदवार प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे शोधून त्यावर प्रहार करायला टपलेलाच असतो. अशा निवडणुकांमध्ये एकमेकांचे उट्टे काढायलाही अनेकजण टपलेले असतात. कुणीतरी कधीतरी या नेतेमंडळींकडून दुखावलेला असतो. एखादे काम घेऊन गेले तर त्याची दखल घेतली गेलेली नसते. त्यावेळी काही बोलता येत नाही; पण निवडणुकांमध्ये त्याचा वचपा काढण्याची संधी छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना असते. ती साधण्याचा प्रयत्न ते करीत असतात. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत मात्र लोकसभेला मदत करूनही महाडिकांनी विधानसभेला आपल्या विरोधात प्रचार केल्यामुळे सतेज पाटील यांनी यावेळी आघाडीधर्माला तिलांजली देत महाडिकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि त्यातूनच ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य लोकप्रिय झाले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम ऐन बहरात आहे. प्रचारसभा, पदयात्रा, घरभेटीसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्व फंडे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते राबवत आहेत. त्यांचे लक्ष्य एकच आहे की, आपल्याला विजयाप्रत नेतील इतक्या मतदारांची जमवाजमव करण्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे. ती झाली की त्यांना हवी ती रसद देऊन मतदारांपर्यंत पोहोचवावे लागते. सध्याच्या धकाधकीच्या वेगवान जगात कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे वाटते तेवढे सोपे नाहीे. कारण कामधाम सोडून फिरायला वेळ आहे कोणाकडे, असा सवाल सर्वसामान्य नागरिक सहजच विचारतात. मात्र, राजकारणाचा किडा ज्याच्या डोक्यात सतत वळवळत असतो तो किंवा देशसेवा, समाजसेवा करण्याची आवड, ध्येय ज्याने ठरवलेले असते असे तरुण कार्यकर्ते प्रत्येक राजकीय पक्षाकडे असतात. त्या तरुणांची मदत अशा जमवाजमवीला सर्वाधिक होते. अशी जमवाजमव करण्यात जो यशस्वी होतो, तो निवडणुकीतही बाजी मारून जातो.
हे एका खासदारासाठीचे झाले. समजा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू संसद अस्तित्वात आली, तर सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे बहुमत मिळविण्याकरिता खासदारांची जमवाजमव करावी लागते. ही जमवाजमव राजकीय पक्ष करतात. सध्याच्या निवडणुकीतील ओपिनियन पोलचे निष्कर्ष पाहता २३ मे नंतर अशी खासदारांची जमवाजमव केली जातानाही देशाला पाहायला मिळणार आहे.

Web Title:  Decree and mobilization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.