शिरोळ : क्षारपड जमीन सुधारणासाठी श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमिनीच्या पुनर्वसनाचे सुरू असलेले काम पाहून मनापासून समाधान वाटते. अनेक जमिनी पुन्हा पिकाखाली येत आहेत. या जमिनींची अतिशय चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले. क्षारपडमुक्त जमिनींचा दत्त पॅटर्न आदर्शवत ठरत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
येथील श्री दत्त कारखान्याच्यावतीने शिरोळ आणि परिसरातील अठरा गावांमध्ये क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे काम सुरु आहे. रविवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिरोळ, घालवाड, अर्जुनवाड याठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. दरम्यान, दत्त कारखाना कार्यस्थळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रोजेक्टरच्या माध्यमातून क्षारपडमुक्त जमीन योजनेची संपूर्ण माहिती आणि आढावा मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा यांनी सादर केला.
गणपतराव पाटील व कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी देखील योजनेची माहिती दिली. यावेळी कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादकांसाठी प्रकाशित केलेल्या शाश्वत ऊस शेतीचा दत्त पॅटर्न या पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. कीर्तीवर्धन मरजे व सुदर्शन तकडे यांनी प्रत्यक्षात काम कसे केले याची माहिती सांगितली. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, महेंद्र बागी, धनाजी पाटील-नरदेकर, अशोक कोळेकर, दिलीप जाधव, सचिव अशोक शिंदे, अमर चौगुले, शक्तीजित गुरव, भैय्यासाहेब पाटील, प्रमोद पाटील, वरुण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - ३००५२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - शिरोळ येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दत्तच्या क्षारपडमुक्त जमीन सुधारणा प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी गणपतराव पाटील, श्रीशैल्य हेगाण्णा, दिलीप जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.