कोल्हापूर जिल्ह्यातील कोविशिल्डचे दोन लाख डोस उपलब्ध असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजूनही लसीकरणाबाबत नागरिक जागरूक नसल्याचे दिसून येत आहे. शेजारी असलेल्या सांगली जिल्ह्यात एका दिवसात दीड लाख डोस दिले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सध्या ३० हजारच डोस दिले जात आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतींनीच लसीकरणाची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. सर्वप्रकारच्या लसींच्या माध्यमातून ३० लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत २१ लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र तरीही अजून ९ लाख नागरिक डोसपासून वंचित आहेत. या सर्वांनी ही लस घेण्याची गरज आहे. २१ लाख जणांपैकी अपवादात्मक काही जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण कमी असून पुन्हा कोरोना झाला तरी ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे त्यांच्या तो जीवावर बेतत नसल्याचे आकडेवारी सांगते.
मध्यंतरीच्या काळात लस उपलब्ध नव्हती, तेव्हा लसीकरणासाठी झुंबड उडाली. धक्काबुक्की झाली. वशिला लावावा लागला. याउलट आता लस उपलब्ध आहे तर ती घेण्यासाठी नागरिकच दवाखान्यात जात नाहीत, असे उलटे चित्र आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशा एक लाख जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही. सध्या जिल्ह्यात अधिकाधिक लस उपलब्ध असतानाही केवळ नागरिकांची अनास्था यामुळे लसीकरण कमी होत आहे. कोरोनाचे आकडे कमी आल्याने नागरिक लसीकरणाबाबत गंभीर नाहीत. परंतु नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असताना ही लसीकरणाबाबतची बेफिकिरी नंतर त्रासदायक ठरू शकते.