इचलकरंजी : पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. बाधित लोकांना महाराष्ट्र शासनाने तत्काळ मदत जाहीर केली होती, ती अद्याप मिळालेली नाही. यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने तत्काळ पंचनामे करून बाधित कुटुंबांना भरपाईपोटी दहा हजार व दहा किलो तांदूळ, गहू व डाळ तसेच रॉकेल देण्याचे जाहीर केले होते. परंतु काही ठिकाणी बाधित असतानाही पंचनाम्यासाठी दिरंगाई केली जात आहे. या कुटुंबांना कोणतीही नुकसानभरपाई किंवा धान्याची पावती मिळाली नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांनी तोंडे बघून पंचनामे केली आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणीही करण्यात आली. शासनाच्या १९ च्या नियमाप्रमाणे एकही कुटुंब नुकसानभरपाई व धान्याच्या पावत्या दिल्या नसल्यास राहिलेल्या कुटुंबांचे पंचनामे न केल्यास १ सप्टेंबरपासून अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. यावेळी दत्ता माने, बाळासाहेब माने, आनंदा चव्हाण, सदा मलाबादे, भरमा कांबळे, सुभाष कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२६०८२०२१-आयसीएच-०३
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. परंतु अप्पर तहसीलदार हजर नसल्याने कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालत असताना आंदोलक.
छाया - उत्तम पाटील